
कुडाळ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक, व्यापारी, कारखानदार आणि लघुउद्योजक यांना अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर आणि वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी 'सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटने'ने महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत संघटनेने महावितरण कार्यालयाला अधिकृत पत्र दिले असून, पावसाळ्यात ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची विनंती केली आहे. हे निवेदन देतेवेळी जिल्ह्यातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटना प्रशासनाने दिलेल्या पत्रात प्रामुख्याने नमूद केले आहे की, जिल्ह्यातील मुख्य ३३ केव्ही (33KV), ११ केव्ही (11KV), एल.टी. (LT) आणि एन.टी. (NT) वाहिन्यांच्या मार्गात येणाऱ्या व धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडी वाढल्यामुळे किरकोळ वादळ किंवा पावसातही वीजपुरवठा खंडित होतो. ही कामे वेळेत न झाल्यास मान्सून सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड होऊन वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे महावितरणने ही मोहीम गांभीर्याने हाती घ्यावी.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर (रोहित्रे) ओव्हरलोड होणे किंवा तांत्रिक बिघाड होऊन जळण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची मान्सूनपूर्व तपासणी व दुरुस्ती करावी, जेणेकरून पावसाळ्यात ग्राहकांना खंडित विजेचा सामना करावा लागणार नाही, असेही संघटनेने म्हटले आहे.
संघटनेने महावितरणचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले आहे. वीज कायदा २००३ च्या अधिनियम क्र. ४७ (५) नुसार, ग्राहकांना आपल्या पसंतीचे किंवा नियमांनुसार मीटर बसवण्याचा कायदेशीर हक्क आहे. सद्यस्थितीत अनेक वीज ग्राहकांनी महावितरणकडे 'स्मार्ट मीटर' लादण्यास लेखी विरोध दर्शवला असून, त्याऐवजी डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची मागणी केली आहे.
हजारो ग्राहकांनी वैयक्तिक स्तरावर जमा केलेले हे 'स्मार्ट मीटर विरोधी अर्ज' महावितरणच्या संबंधित कार्यालयांनी स्वीकारून त्याची रितसर दखल घ्यावी आणि ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादू नयेत, असा इशाराही संघटनेने दिला आहे. इलेक्ट्रॉनिक टी.ओ.डी. मीटर बसवण्याबाबतही आवश्यक ती कार्यवाही व्हावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन सादर करतेवेळी आणि या संदर्भातील चर्चेप्रसंगी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, सचिव तुकाराम म्हापसेकर, दोडामार्ग संघटना सचिव भूषण सावंत उपस्थित होते. तसेच या मागणीला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोणकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाथ धुरी, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, संजय गावडे, सुदन कवठणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज, पंचायत समिती सदस्य कृष्णा धुरी, आंब्रडच्या सरपंच मानसी कदम, स्वप्नील मुंज, पांडुरंग दळवी आणि महेंद्र कदम** उपस्थित होते. महावितरणच्या वतीने वीज अधिकारी वनमोरे, महावितरण पब्लिक रिलेशन ऑफिसर विश्वजीत भोसले व इतर अधिकारी, कर्मचारी आणि अनेक वीज ग्राहक याप्रसंगी उपस्थित होते.










