म्हापण : अखेर म्हापण भाजपमध्ये राजकीय भूकंप झाला. म्हापण भाजपमध्ये राजकीय भूकंप हे वृत्त 'कोकणसाद लाईव्ह' व 'दैनिक कोकणसाद'ने सर्वात प्रथम प्रसिद्ध केले होते. हे वृत्त आज तंतोतंत खरे ठरले आहे. भाजप पक्षाच्या तब्बल ४६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचे पत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण व तालुकाध्यक्ष वेंगुर्ले यांना पाठवली आहेत. पदाधिकारी यांच्या राजीनाम्याची पत्रे कोकणसाद लाईव्ह च्या हाती आहेत.
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक व राणे कुटुंबीयांना मानणारा मोठा गट आहे. परंतु अलीकडच्या राजकारणात म्हापणमध्ये भाजप पदाधिकारी यांच्यात दोन गट झाले होते. अगदी अलीकडे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा मूळ भाजपकडून उभे राहिलेले उमेदवार व भाजप उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार यांनी आयत्या वेळी केलेल्या भाजप प्रवेशामुळे येथील अंतर्गत वाद उफाळून आला होता. एका अपक्ष उमेदवार गटाने आयत्यावेळी या मतदारसंघातील वरिष्ठ नेते, व पदाधिकारी यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या अपक्ष गटाला बळ देण्याचे काम चालू होते. त्यामुळे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आयत्यावेळी स्थानिक कट्टर भाजप पदाधिकारी यांना वगळून अपक्ष म्हणून निवडून आलेले व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा घेत उपसरपंच पद देवून बळ दिले गेले. त्यामुळे येथील कट्टर पदाधिकारी काहीसे नाराज झाले होते.
मात्र ज्या कट्टर भाजप पदाधिकारी यांनी एक-एक ग्रामपंचायतीचा उमेदवार निवडून आणण्यास आपल्या जीवाचे रान केले. त्यांना मात्र अंतर्गत राजकीय धुसफुसमुळे पद्धतशीरपणे येथील अप्रक्षरित्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सांगण्यावरून कट्टर पदाधिकाऱ्यांच्या गटाला बाजूला ठेवून दुसऱ्या गटाला राजकीय बळ देऊन कारस्थान केली जात असल्याचेही उघडकीस येत होते.
आपल्या विरुद्ध छुप्या बैठका घेऊन वेळोवेळी अन्याय होत असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांकडे कडून व्यक्त होत होत्या. मात्र आपल्याला वरिष्ठ नेतृत्व न्याय देईल असे वाटत असतानाच म्हापण विविध सोसायटीच्या निवडणुकीत हा वाद आणखीच चिघळल्याचे दिसून आला. वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याकडून देखिल कट्टर गटाला सोडून दुसऱ्या गटाला बळ दिले जात असल्याने कट्टर गटाच्या पदाधिकारी यांच्यावर मात्र अन्याय होत असल्याची भावना ही व्यक्त होत होती. अशा या छुप्या राजकारणाला कंटाळून स्थानिक पदाधिकारी यांनी यापुढेही आपल्याला योग्य न्याय मिळेल असे वाटत नाही, म्हणून म्हापण मधील भाजपचे बूथ प्रमुखांपासून युवा पदाधिकारी व वरिष्ठ पदाधिकारी हे आपल्या पदांचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. त्याप्रमाणे आज हे राजीनामे देण्यात आले आहेत.