
सावंतवाडी : पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत मंत्री दीपक केसरकर यांनी किती जणांना नोकऱ्या दिल्या ? आणि मतदारसंघात किती विकास कामे केली हे त्यांनी जाहीर करावे. खोटी आश्वासने देणे व खोटे बोलणे हेच केसरकर यांचे काम आहे. खोटे बोलण्याऱ्यांचे विद्यापीठ सुरू करा आणि त्याचे कुलगुरू दीपक केसरकर यांना करा, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आपण करणार असल्याचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.
जिल्ह्यातील इतर मतदारसंघात विकास झाला आहे. मालवण येथे 15 लाख पर्यटक येतात. मात्र सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ला, आंबोली येथे पर्यटक का येत नाहीत त्याचे आत्मपरीक्षण दीपक केसरकर यांनी करावे. निवडणुकी आल्या की खोटे बोलून व आश्वासने देऊन केसरकर जनतेची दिशाभूल करतात. काही महिन्यापूर्वी त्यांनी ताज व सिधादी फाईव्ह स्टार हॉटेलच्या भूमिपूजनाची आणि उद्घाटनाची तारीख ही जाहीर केली होती. त्याचे काय झाले हे केसरकर यांनी सांगावे. जिल्ह्यात सणानिमित्त तरी चाकरमानी येतात मात्र आपल्या मतदारसंघात फिरायला मंत्री केसरकर यांना वेळ नाही. कालच त्यांनी आडाळी एमआयडीसीमध्ये दौरा करून चंदीगड येथील कंपनी लवकरच सुरू होणार असून त्यामुळे पाचशे तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होतील असे सांगितले. याबाबत मी एमआयडीसी रिजनल ऑफिसरला विचारणा केली असता आडाळी एमआयडीसीमध्ये या कंपनीने जागा घेतली नसल्याचे रिजनल ऑफिसर यांनी सांगितल्याचे राजन तेली यांनी सांगितले. दीपक केसरकर यांच्या नाकर्तेपणामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची पिच्छेहाट झाली आहे. केसरकर यांनी आमने-सामने येऊन मतदारसंघात कोणती कामे केली ती सांगावीत. केसरकर यांना पुन्हा निवडून आणून आपल्या मतदारसंघाचे नुकसान करून घेऊ नका, असे आव्हान तेली यांनी केले.
दीपक केसरकर यांना त्यावेळी विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांचा प्रचार करणार नाही, त्यांना माझा कायमच विरोध राहील, केसरकर यांना निवडून आणून येथील जनतेचे नुकसान मी करणार नाही असे तेली यावेळी म्हणाले.