कणकवली : कोरोनाकाळात कणकवली-सांडवे बुधवळे मार्गे जाणारी एसटीची बसफेरी बंद करण्यात आली आहे. सदर बसफेरी अद्यापही बंद असल्याने मठबुद्रुक व बुधवळे गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने ही बसफेरी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांनी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन मसुरकर यांनी कर्मचारी विशाल कांबळी यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनापूर्वी कणकवली आगारातून नियमित दुपारी ३.३० वा. कणकवली – बुधवळे ही बसफेरी सुरु होती. मात्र, कोरोनाच्या काळात सदर बसफेरी बंद करण्यात आली. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर देखील सदर बसफेरी बंद आहे. परिणामी मठबुद्रक व बुधवळे गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर बसफेरी पुन्हा सुरु करावी, अशी विनंती मसुरकर यांनी विभाग नियंत्रक यांना केली आहे.