
कणकवली : आंबा काजू बागायतदारांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात उबाठा शिवसेनेचे मुंबई व सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आंबा, काजू शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला.
पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कणकवलीत उबाठा शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. नाईक म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहोत. आंबा, काजू बागायतदारांचा मोर्चा मुंबईत होत असून आमचे मुंबईतील तसेच सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी मोर्चात सहभागी असणार आहेत. जोपर्यंत आंबा, काजू शेतकर्यांना जास्तीतजास्त मदत होत नाही तोपर्यंत शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उबाठा शिवसेना पक्षातर्फे हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे नाईक म्हणाले.










