
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अनेक गुणवंत भजनी कलाकार आहेत. त्यांना अनेक समस्यांना वेळोवेळी सामोरे जावे लागत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या सहकार्याने भजनी कलाकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील. तसेच भजन कलेला शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न करणार आहोत. असे प्रतिपादन 'भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग' चे अध्यक्ष भजन सम्राट संतोष कानडे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांचा मेळावा येथील भगवती मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते. जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या 'भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग'या संस्थेचा हा पाहिला भव्य मेळावा आणि सर्वसाधारण सभा होती. नव्याने स्थापन झालेल्या संस्थेची ध्येय-धोरणे ठरविणे तसेच घटना निश्चित करणे आणि सर्वानुमते घटनेला मान्यता देणे तसेच भजनीबुवांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
'गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु' आणि 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमुची प्रार्थना' या दोन प्रार्थना गीतांच्या गायनाने भजनी बुवांच्या या मेळाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर बुवा संतोष कानडे यांनी उपस्थिताना घटना वाचून दाखवली. सर्वांनी एकमताने घटनेला मान्यता दिली. भजनी कलाकारांनी अनेक विषय मांडत भजनी कलाकारांच्या हितासाठी संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी यावर आपली मते मांडली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भजनसम्राट प्रकाश पारकर म्हणाले, सर्व भजनी कलाकारांना सोबत घेऊन आम्ही ही भजन संस्था चालविणार आहोत. भजनी कलाकारांकडून सादरीकरण करत असताना कधीतरी चुका झाल्या तरी तेही आपल्याच परिवारातील असल्यामुळे त्यांना समजून घेऊन ,वेळप्रसंगी योग्य ते मार्गदर्शन करून भजनी कलाकारांच्या हितासाठी कार्य करू. आवश्यकता भासेल त्यावेळी त्यांच्या निश्चितपणे पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध समालोचक राजा सामंत, भजन सम्राट, सिंधुरत्न भालचंद्र केळुसकर बुवा, भजन सम्राट विजय परब बुवा आणि अन्य भजनी कलाकारांनी मनोगत व्यक्त करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भजनी कलाकारांच्या विविध समस्या, सूचनावर चर्चा झाल्यानंतर संस्थाध्यक्ष संतोष कानडे बुवा,सचिव गोपी लाड बुवा व इतर सर्व पदाधिकारी यांचे उपस्थित भजनी कलाकारांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.