
कणकवली : पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आणि प्रवाशांनी नेहमी गजबजलेल्या कणकवली बस स्थानकात गुरुवारी सायंकाळी उशिरा स्वच्छतेचा जागर करण्यात आला. स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग ने हा उपक्रम पुढाकार घेऊन राबवला. प्रत्येक प्रवाशाला रेल्वे स्थानक, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक स्वच्छ ठेवण्याची विनंती करण्यात आली व पत्रके वाटण्यात आली.
कणकवली हे जिल्ह्यातील एक सुशोभित रेल्वे स्थानक असून दररोज हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असतात. काही प्रवाशांकडून प्लास्टिक कचरा व इतर कचरा रेल्वे स्थानक परिसरात टाकला जातो.प्लॅटफॉर्मवर सुद्धा कचरा टाकला जातो. त्यामुळे सुशोभित असणारे हे रेल्वे स्थानक कचऱ्यामुळे काही वेळा विद्रूप झाल्यासारखे वाटते. रेल्वे प्रशासनाने इथे बकेट ठेवली असून त्याचाही वापर काही वेळा प्रवासी करत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग या ग्रुपने तिथे प्रवाशांमध्ये स्वच्छता विषयक जागृती करण्याचा उपक्रम राबवला.
तुतारी एक्सप्रेस,कोकणकन्या एक्सप्रेस आणि मंगलोर एक्सप्रेस मधून प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकात आले होते . या सर्व प्रवाशांना प्रत्यक्ष भेटून त्यांना पत्रक देऊन कचरा रेल्वे स्थानक किंवा प्लॅटफॉर्मवर टाकू नये, तसेच रेल्वे गाडीमध्ये कचरा फेकू नये अशी विनंती करण्यात आली .या उपक्रमाला प्रवाशानिही सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक प्रवाशांनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.तसेच अभिनंदनही केले.
या उपक्रमात कणकवली व्यापारी संघटना अध्यक्ष दिपक बेलवणकर,प्रतिथयश वकील विलास परब,स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग प्रमुख गणेश जेठे,सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत भावे,नायब तहसीलदार दिलीप पाटील, कणकवली नायब तहसीलदार मंगेश यादव, रेल्वे पोलीस अधिकारी राजेश सुरवाडे,महिला पोलिस नाईक विनया सावंत,
पोलिस कॉन्स्टेबल स्नेहा चरापले,वाघेरी सरपंच अनुजा राणे,पोलीस पाटील अनंत राणे,पत्रकार अजित सावंत,नितीन सावंत,उमेश बुचडे,मोहन पडवळ,उत्तम सावंत, गुरुप्रसाद सावंत,तुषार नेवरेकर, संजय पेटकर,सुधीर जोशी,प्रा.एम.बी. शेख,विनायक पाताडे,अनिल मेस्त्री, आनंद परब,प्रदीप फोपे,सूर्यकांत लाड याच्यासह कोकण रेल्वे अधिकारी, कर्मचारी,रिक्षा व्यावसायिक व नागरीक सहभागी झाले होते होते.
उपक्रमाच्या सुरुवातीला गणेश जेठे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. राष्ट्रगीत गाऊन उपक्रमाला प्रारंभ झाला.यावेळी श्री बेलवलकर यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. विलास परब यांनी स्वच्छता मिशन जिल्ह्यात आणखी विस्तारित जाईल असा संदेश दिला. संतोष राऊळ यांनी स्वच्छता मिशनला आपले संपूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले. भगवान लोके यांनीही स्वच्छतेचा संदेश दिला. दिलीप पाटील यांनी आभार मानले.