जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी ; शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ

वैभव नाईकांचं सरकार - प्रशासनावर टीकास्त्र
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 13, 2024 13:58 PM
views 164  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ ९ दिवसच पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून सरकारकडून आणि पोलिसांकडून जयदीप आपटेच्या विरोधात मालवण न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्यानेच त्याला दिलासा मिळाला आहे.

सुरुवातीला जयदीप आपटेचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले होते. त्यानंतर १० दिवसांनी ४ सप्टेंबर रोजी तो त्याच्या घराजवळच पोलिसांना सापडला होता. जयदीप आपटे याला अटक केल्यानंतर अन्य कोणाही संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. व आता केवळ ९ दिवसांत जयदीप आपटेची पोलीस कोठडी संपल्याने जयदीप आपटेची अटक हि प्री प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर या घटनांवरून सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह खाते आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्या संगनमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला असून हा भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला पोलिसांकडून अभय देण्यात आल्याची टीका कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.