मालवण : मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या आचरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. भाजपाच्या वतीने सरपंच पदाचे उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आचरा येथे जाहीर केली आहे.
आचरा येथील हॉटेल डॅफोडील येथे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी माहिती दिली. यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी सभापती नीलिमा सावंत, माजी जिप सभापती तथा सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे, डॉ. प्रमोद कोळंबकर, धंनजय टेमकर, चावल मुजावर, मंदार सरजोशी, अवधूत हळदणकर, रुपेश हडकर, किशोरी आचरेकर, किशोर आचरेकर, योगेश गावकर, पंकज आचारेकर, लवू घाडी, प्राजक्ता देसाई, प्रियता वायंगणकर, संतोष मिराशी, श्रुती सावंत, चंद्रकांत कदम, सायली सारंग, सारिका तांडेल, हर्षदा पुजारे, सचिन हडकर, केदार गावकर यासह भाजप पदाधिकारी विजय निकम, विरेश पवार उपस्थित होते. आचरा प्रभारी म्हणून संतोष गावकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती चिंदरकर यांनी दिली.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे जेरॉन फर्नांडिस यांच्या उमेदवारीला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर वरिष्ठाशी बोलून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
सदस्य पदासाठी अनेकजण इच्छुक उमेदवार आहेत. मात्र सदस्य पदाचे उमेदवारही लवकर जाहीर केले जातील. एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. राज्यात भाजप शिवसेना मित्रपक्ष युती सरकार आहे. त्याचा विचार करता याठिकाणी युती म्हणून निवडणूक लढावण्याबाबत चर्चा सुरु आहे. वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील असे चिंदरकर म्हणाले.
आचारे गावात भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देश प्रगतीपथावर जात असताना गाव विकासालाही महत्व प्राधान्य दिले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावविकासाला प्राधान्य देत मोठा निधी उपलब्ध केला जात आहे. भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या माध्यमातून अनेकांना मदत विकासकामे यांना प्राधान्य दिले जात असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले. भाजप कार्यकर्ते व आचरावासिय ग्रामस्थ यांच्या पाठिंब्यावर भाजप उमेदवार यांचा विजय निश्चित असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
10 वर्षे आमदार असताना वैभव नाईक यांना याठिकाणी उमेदवार शोधावे लागतात. उमेदवार मिळत नसल्याने उमेदवार आयात करावे लागतात. हे अपयश आमदार वैभव नाईक यांच्या कारभाराचे आहे. निवडणुकीतही ठाकरे गटाचा पराभव करत वैभव नाईक यांना भाजप स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते जागा दाखवून देतील. आयात उमेदवार यामुळे नाराज ठाकरे गट अनेकजण भाजपला पाठिंबा व्यक्त करत असल्याचा दावा धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.