दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 09, 2026 20:24 PM
views 12  views

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे ताडाचा कोंड येथील २०८७.०४ चौ. मी. शासकीय जमीन चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणीसाठी देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेण्यात आहे. 

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत हे केंद्र उभारल्यामुळे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्थानिक नागरिकांना तात्काळ सुरक्षित निवारा उपलब्ध होईल. नियोजन प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार या जमिनीचा विकास करणे आवश्यक असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

ताडाचा कोंड येथील स.नं. ६१/१ मधील एकूण २० हेक्टर ३७ आर क्षेत्रापैकी २०८७.०४ चौ. मी. जमीन 'जिल्हाधिकारी रत्नागिरी' यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. ही जमीन प्रदान करताना शासनाने अटी लागू केल्या आहेत. ही जमीन 'भोगवटादार वर्ग-२' म्हणून धारण केली जाईल. या जमिनीचा वापर केवळ मंजूर निवारा केंद्राच्या प्रयोजनासाठी करणे बंधनकारक राहील. प्रयोजनासाठी वापर थांबवल्यास ही जमीन विनामोबदला शासनास परत करावी लागेल. जमिनीखालील सर्व खाणी आणि खनिजांवरील अधिकार शासनाकडेच राखीव राहतील.

"कोकणच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ताडाचा कोंड येथील जागा महसूल मुक्त आणि भोगवटा मूल्यरहित तत्त्वावर उपलब्ध करून दिल्याने निवारा केंद्राचे काम आता वेगाने सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख करत आहोत."

चंद्रशेखर बावनकुळे

महसूल मंत्री

• रघुनाथ पांडे