
सावंतवाडी : बांदा ग्रामपंचायतीच्या नूतन मच्छिमार्केट वास्तूचे लोकार्पण शिक्षणमंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याहस्ते फित कापून नूतन इमारतीचे उदघाट्न करण्यात आले.
या वस्तूचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण,मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, आम्ही एकत्र काम करत आहोत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे नेहमी सकारात्मक असतात. आम्ही विकासकामांसाठी मागितलेल्या निधीला ते तात्काळ मंजुरी देतात.
त्यामुळे मळगाव रेल्वे स्टेशनकडे जाणारा प्रशस्त असा रस्ता होणार आहे. तसेच बांद्यात क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी होती. त्यासाठीही साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंत्री चव्हाण यांनी मंजूर केला आहे.या ठिकाणी स्पोर्ट स्कुल व क्रिडासंकुल उभारण्यात येणार आहे.जेणेकरून या स्कुलच्या माध्यमातून क्रीडा संकुलाची देखभालीचा खर्चाचा बोजा ग्रामपंचायतीवर पडणार नाही.तसेच याठिकाणी रिव्हर बोटिंग प्रकल्प प्रस्तावित आहे.त्याची सुरुवात बांद्यातून व्हावी अशी आमची इच्छा आहे.तसेच बांद्यातील पोलीस स्टेशनसाठीही निधी मंजूर झाला आहे.
याठिकाणी असलेला गडकिल्ला पर्यटकांना आकर्षण ठरावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.रेडे घुमट सारख्या स्थळाची प्रसिद्धी होण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.यापुढेही बांदा गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या महामार्गालगत तुम्ही जागा उपलब्ध करू द्या.याठिकाणी भव्यदिव्य असे होलसेल मार्केट उभारूया.जेणेकरून आपल्या मच्छि विक्रेत्यांना गोव्यात जाऊ लागू नये.गोव्यातील लोकांना येथे येऊन खरेदी करता येईल.पालकमंत्री चव्हाण यांच्या खात्यातून नक्कीच यासाठी प्रयत्न होतील असा आशावाद केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, आमचं सरकार हे जनतेचं सरकार आहे.येथील जनतेचा विकास हाच आमचा ध्यास आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही काम करत आहोत.बांदा ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी बांदा ग्रामपंचायतीचे कौतुक केले.तर गावाच्या विकास कार्यासाठी झटणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अभिमान असल्याचे सांगत गावासाठी कोणतीही मागणी करा, ती पूर्ण करू अशी ग्वाही देत या ग्रामपंचायतीची अग्निशमन बंबाची मागणीही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी प्रस्ताविकात दोन्ही मंत्र्यांनी विकासकामासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब,माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी आमदार राजन तेली,भाजप महिला जिल्हा अध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर,माजी सरपंच मंदार कल्याणकर,माजी पंचायत समिती सभापती शीतल राऊळ,माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत,एकनाथ नाडकर्णी, बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत,ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे,जावेद खतीब,शामसुंदर मांजरेकर,साईप्रसाद काणेकर,राजाराम धरगळकर, सौ.रुपाली शिरसाट, रिया येडवे,तनुजा वराडकर,शिल्पा परब,अरुणा सावंत,श्रेया केसरकर,देवल येडवे,प्रशांत बबांदेकरशिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर,पांडुरंग नाटेकर,डेगवे सरपंच राजन देसाई,मधुकर देसाई,प्रवीण देसाई यांच्यासह भाजप शिवसेना पदाधिकारी आणि बांदा ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांदा मंडळ अध्यक्षा सौ.रुपाली शिरसाट यांनी केले. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.