वेंगुर्ला : तालुक्यातील मातोंड गावठणवाडी तसेच नाटेलीवाडी येथे खऱ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भातशेतीचे गव्यारेड्यांनी नुकसान केले आहे. त्यामुळे अगोदरच उशिरा पडलेल्या पावसामुळे भात शेती उशिरा सुरू झाली त्यात आता गव्या रेड्यांनी शेतीची नासधूस केल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गव्यारेड्यानी मातोंड गावठणवाडी येथील शेतकरी दिलीप परब, महेश मातोंडकर, अनंत नर्से, सुदाम राठये, संतोष परब तर नाटेलीवाडी येथील विठोबा केणी, ज्ञानेश्वर केणी, सुभाष नाईक, सुंदर जबडे, संदेश कोरगावकर, प्रदीप जबडे, गिरीजा नाईक यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. यापूर्वी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या इतर मिरची शेती तसेच इतर भाज्यांच्या शेतीचे सुद्धा या गव्यांनी मोठे नुकसान केले होते. त्यामुळे या गव्यांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाले असून याकडे वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.