वैभववाडी : शुकनदीच पात्र पुर्णतः कोरडे झाले आहे.या भागातील पाणी पातळीत प्रचंड घट झाली असुन या नदीच्या पाण्यावर अवंलबुन असलेली शेती संकटात आली आहे.त्यामुळे खांबलवाडी लघु प्रकल्पाचे पाणी शुकनदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी नापणे गावचे सरपंच प्रदीप जैतापकर यांनी तहसिलदारांकडे केली आहे.
नापणे सरपंच श्री.जैतापकर यांनी आज ता.१० तहसिलदारांना निवेदन दिले.वाढलेल्या तापमानामुळे शुकनदीतील पाणी पुर्णत आटले आहे.काही ठिकाणी तर नदीपात्र पुर्ण कोरडे पडले आहे.शुकनदीच्या पाण्यावर शेकडो एकर ऊसशेतीसह विविध फळबागांचे भवितव्य अवंबलुन आहे.सध्या नदीमध्ये पाणी नसल्यामुळे ही सर्व शेती संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे ही शेती वाचविण्यासाठी खांबलवाडी लघु प्रकल्पाचे पाणी शुकनदीपात्रात सोडण्याशिवाय दुसरा सध्या पर्याय नाही.गेल्या दोन तीन वर्षापासुन या प्रकल्पाचे पाणी शुकनदीपात्रात सोडलेले आहे.त्यामुळे तातडीने या प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी श्री.जैतापकर यांनी केली आहे.