सैनिकांच्या कल्याणासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा - ब्रिगेडियर सुधीर सावंत

सैनिक पतसंस्थेच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार !
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 11, 2023 19:01 PM
views 170  views

सावंतवाडी : आपण आजपर्यंत सातत्याने माझ्या सैनिक बांधवांच्या कल्याणासाठी शासन दरबारी लढा दिला आहे. सैनिकांसाठी असलेल्या विविध योजना व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी येथे व्यक्त केले.

 सावंतवाडी शहरातील वैश्य भवन येथे शनिवारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार सोहळा तसेच माजी संचालक व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अशा सैनिक बांधवांचा स्नेहसत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित चेअरमन बाबुराव कविटकर होते. यावेळी व्यासपीठावर संस्थापक चेअरमन पी. एफ. डान्टस, माजी चेअरमन शिवराम जोशी, 'आयएसएल'चे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष तातोबा गवस, माजी सैनिक फेडरेशनचे पी. टी. परब,

 व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, संचालक दीनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, श्यामसुंदर सावंत, संतोष मुसळे, शांताराम पवार, बाबू वरक, प्रियांका गावडे, कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, माजी संचालक नामदेव चव्हाण, मंगेश गावकर, राजाराम वळंजू, बाबली गावडे, ललिता भोळे, स्वाती राणे आदी

उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, आगामी काळात सैनिकांसाठी अनेक योजना व नोकरीच्या संधी विद्यमान शासन करणार आहे. तसा सातत्याने पाठपुरावा आपल्या स्तरावरून आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थापक चेअरमन  पी. एफ. डान्टस म्हणाले, आपण लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आगामी काळात बँकेचे भांडवल वाढविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श अशी पतसंस्था सैनिक पतसंस्था असून याचे श्रेय सर्व संचालक, कर्मचारी, ठेवीदार व आजी-माजी सैनिक बांधवांना जाते.

विद्यमान चेअरमन बाबुराव कविटकर म्हणाले की, आपल्या सैनिक पतसंस्थेला दैदीप्यमान परंपरा असून अनेक ज्येष्ठ व ज्ञानाने अनुभवी असलेल्या माजी चेअरमन व संचालक मंडळाचा वेळोवेळी सल्ला घेऊन आगामी काळात पतसंस्था विकासात्मकदृष्ट्या वाढविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य आणि जबाबदारी प्रामाणिक पार पाडणे गरजेचे आहे.

यावेळी उपस्थित असलेले सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष तातोबा गवस यांनीही आपल्या मनोगत आतून पतसंस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले.

प्रास्ताविक सादर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ म्हणाले, सैनिक पतसंस्था ही केवळ पतसंस्था नसून हा एक परिवार आहे. प्रत्येकाच्या सुख - दुःखाची जबाबदारी घेऊन प्रत्येकाचे आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी सातत्याने पतसंस्थेच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. राज्यात आदर्श पतसंस्था म्हणून सातत्याने सैनिक पतसंस्थेला गौरविले जाते, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे सांगत त्यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या वतीने सिल्वर धनलक्ष्मी बॉंड लकी ड्रॉ काढण्यात आला. यात विजेत्यांना तीन टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक व तीन टीव्हीएस ज्युपिटर मोपेड गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या.


सैनिक लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार !

 दरम्यान सैनिक पतसंस्थेच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविलेल्या माजी सैनिक व कुटुंबीयांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यात पिंटो अँथोन, दीपक राऊळ, सपना सावंत, मोहन राऊळ, तुकाराम आमुणेकर, रसिका आईर, लक्ष्मी राऊळ, अरुणा सावंत, ऋतुजा परब, कामिनी परब यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी २०२२ साली सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा व माजी चेअरमन, तसेच माजी संचालक यांचाही आदरपूर्वक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांनी केले.