गेळे ग्रामस्थांच उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची करणार मागणी : संदीप गावडे
Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2024 12:40 PM
views 274  views

सावंतवाडी : गेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात मागीलवर्षी २६ जुलै रोजी शासन निर्णय होऊन देखील तसेच त्या संदर्भात गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिलेले असतानाही  जमीन वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची याबाबतची भुमिका संशयास्पद आहे. त्यामुळे प्रशासनाला या संदर्भात जाग आणण्यासाठी गुरुवार २५ जुलै रोजी दु.११.३० वाजले पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा गेळे ग्रामस्थांच्यावतीने माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला. दरम्यान, याबाबत पालकमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस, तुकाराम बंड, देवसू सरपंच रूपेश सावंत, श्रीकृष्ण गवस आदी उपस्थित होते.

गेळे गावातील कबुलायतदार गांवकर जमीनी वाटपा संदर्भात २६ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय झाला होता. मात्र, त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्या त्रुटी व वाटपासंदर्भातील अहवाल आम्ही पालकमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर शासन स्तरावर तीन ते चार वेळा या संदर्भात बैठका घेण्यात आल्या.  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे हा विषय शासन निर्णयापर्यंत तरी पोहोचला. त्यामुळे त्यांचे नक्कीच आभार असल्याचे संदीप गावडे म्हणाले.

त्यानंतर १६ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित वन अधिकाऱ्यांनी वनसंज्ञा जमीनीचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याचे स्पष्ट केले. तर महाराष्ट्र शासन उल्लेख असलेल्या जमीनी वाटत करण्याचे अधिकार यापूर्वीच शासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. मात्र, असे असून देखील जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत टाळाटाळ होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचा दबाव आहे की यामागे कोणी पडद्यामागचा सुत्रधार आहे का, असा संशय उपस्थितांनी व्यक्त केला. 


महाराष्ट्र शासनाचा २६ जुलै रोजी झालेला निर्णय व १३ मार्चला अलिकडेच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश असताना देखील जिल्हा प्रशासन निष्क्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या उपोषणाच्या माध्यमातून यामागे नेमके कोण आहे, याचा बुरखा फाडला जाणार असा संदीप गावडे यांनी यावेळी दिला.