राजन तेलींची भाजपातून हकालपट्टी करा..!

वरिष्ठांकडे मंत्री केसरकर करणार मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: July 07, 2024 12:30 PM
views 967  views

सावंतवाडी : राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे ? एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हायचं म्हणून पातळी सोडून टीका ते करत आहेत. तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे. खालच्या पातळीवर जाऊन बोलायची पण एक मर्यादा असते.  मला बोलायचं झालं तर मी खुप काही बोलू शकतो. पण, महायुतीचा धर्म पाळणारा मी आहे. तेलींच अस्तित्व हे सिंधुदुर्ग जिल्ह्यापुर्ती आहे. त्यामुळे यापुढे राजन तेली हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यांच्या टीकेवर उत्तर हे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते देतील असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत तेलींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

मंत्री केसरकर म्हणाले, मी तीनदा आमदार होऊन दोनदा मंत्री झालो आहे. माझं शिक्षणमंत्री म्हणून काम काय आहे याचा अभ्यास तेलींनी करावा, त्यानंतरच टीका करावी. विविध उपक्रम आम्ही राबविलेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे तीन रेकॉर्ड आम्ही केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. डॉक्टर प्रमाणे शिक्षकांना टीआर पदवी दिली आहे‌. माझ्या कामाचं कौतुक महाराष्ट्र करत आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

तर, माजी आमदार राजन तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे. खालच्या पातळीवर जाऊन बोलायला पण मर्यादा असते.  मला बोलायचं झालं तर मी खुप काही बोलू शकतो. पण, मी महायुतीचा धर्म पाळणारा आहे. महायुती अडचणीत असताना चुकीची वक्तव्य कुणी करू नये. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याही मी जवळ आहे. अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला दिली. त्यामुळे यापुढे राजन तेली यांच्याविषयी मला विचारू नका. त्यांच्यावर बोलण्याएवढे ते मोठे नाहीत. त्यांच्या वक्तव्यावर  भाजपने हकालपट्टीची कारवाई करावी अशी मागणी मी करणार आहे. पराभूत खासदारांशी त्यांचे सुर जुळताना दिसत आहेत. राजन तेली हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे‌. अशा पद्धतीने पत्र कुणी काढत असतील तर ते महायुतीत सहन केलं जाणार नाहीत. 

दरम्यान, शाळा नं एक दुरूस्तीच्या यादीत नव्हती‌. आपत्कालीन स्थितीमुळे ती पडझड झाली. खासदार झालेल्या विनायक राऊत यांना जिल्हा परिषद शाळांची निगा राखत याचीही कल्पना नसावी ही बाब दुर्देवी आहे. ही शाळा दुरुस्ती खाली नव्हती. कौल फुटून पाणी गेल्याने हा प्रकार घडला. सुदैवाने मुलं नसताना हा प्रकार घडला. याबाबत योग्य ती चौकशी केली जात आहे. नादुरुस्त शाळांत माझे कार्यकर्ते जाऊन किरकोळ दुरुस्तीच काम करत आहे‌त. सरकारचे पैसे मिळण्याआधी आम्ही सुरूवातीला मदत पोहचवत आहोत अशी माहीती मंत्री केसरकर यांनी दिली.