LIVE UPDATES

तळकटमध्ये हत्तींचे धुमशान

Edited by: लवू परब
Published on: June 11, 2025 21:06 PM
views 197  views

दोडामार्ग :  तळकट कोलझर परिसरात मागील काही दिवसांपासून जंगली हत्तींचे धुमशान सुरू आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हत्तींच्या कळपाने केळी, नारळ, सुपारीच्या बागांना लक्ष्य करून उपद्रव माजविला आहे. स्थानिक शेतकरी भयभीत असून वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी होत आहे.

तिलारी खोऱ्यात हत्तींच्या दोन कळपांचा वावर होता. यातील एक कळप दहा दिवसांपूर्वी तळकट परिसरात दाखल झाला. त्यामागोमाग दुसरा कळपही तेथे दाखल झाला. सध्या तिथे सहा हत्तींनी बस्तान मांडले आहे. हे हत्ती दिवस रात्र येथील शेतकऱ्यांच्या बागायती पायदळी तुडवून त्यांची नासधूस करत आहे. काही ठिकाणी संपूर्ण बाग नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्तींची हालचाल अधिक असल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

मंगळवारी रात्रभर हत्तींच्या कळपाने विविध बागांमध्ये धुडगूस घातली. यात महेश जानबा देसाई यांच्या नारळ व सुपारीच्या बागेत घुसून प्रचंड नुकसान केले. काही माड उन्हाळून टाकले तर काही सुपारीची झाडे उध्वस्त केली. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात दिवस-रात्र हत्ती नुकसान करत असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वनविभागाची उपाययोजना तोकडी पडत असून शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच नष्ट होत आहे. या हत्तींना येथून पिटाळून लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

नारळ, सुपारी पासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरात दाखल होणारे हत्ती आमच्या बागेतूनच जातात. त्यामुळे उपजीविकेचे एकमेव साधन हत्ती उध्वस्त करत आहे. “तासन्‌तास रात्र जागून काढावी लागते. हत्ती येऊन बाग उध्वस्त करतात आणि अनेक वर्षांच आमच्या कष्टाचं श्रम एका रात्रीत वाया जातं" असे मत नुकसानग्रस्त शेतकरी महेश जानबा देसाई यांनी व्यक्त केले.