15 दिवसांपूर्वी परदेशातून गावी परतला ; काळाने घाला घातला

लहान भावाचा मृत्यू, मोठा भाऊ गंभीर
Edited by: लवू परब
Published on: June 14, 2025 21:14 PM
views 1098  views

दोडामार्ग : मांगेली कुसगेवाडी येथे ११ केव्ही उच्चदाब विद्युत लाईनच्या संपर्कात आल्याने दोन सख्ख्या भावांना विजेचा जोरदार धक्का बसला त्यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. नागेश पांडुरंग गवस (३३) असे मृत युवकाचे नाव असून संदीप पांडुरंग गवस (४५) याच्यावर गोवा बांबोळी येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोडामार्ग ग्रामीण रुगणलयात उपस्थित जमावाने विजवितरणचे अधिकऱ्यांना धारेवर धरत मृतांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत, शासकीय नोकरी व जखमीवर उपचार करण्यास हॉस्पिटल मधील खर्च या मागणीसाठी वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्या नंतर या सर्व मागण्या विजवितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या नंतर उपस्थित ग्रामस्थ व राजकीय पुढारी शांत झाले. त्या नंतर शवविच्छेदन करण्यास सांगितले. जवळ जवळ पाच ते सहा तास ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वाटावरण पहावयास मिळाले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशिकी मांगेली कुसगेवाडी येथे विजेचा लपंडाव सुरु होता तो सुरळीत करण्यासाठी शनिवारी सकाळच्या सुमारास महावितरणचे दोन कर्मचारी गावात दाखल झाले. यावेळी त्यांनी मदतकार्यासाठी संदीप गवस व नागेश गवस या दोघांना शिडी आणण्यास पाठविले. ते दोघेजण शिडी घेऊन आल्यानंतर त्यांना उभी करण्यास सांगून महावितरणचे कर्मचारी बाजूला गेले. नागेश गवस शिडी उभी करत असताना खाली लोंबकळत असलेल्या ११ केवीच्या विद्युत भारीत वाहिनीला शिडीचा संपर्क‌ झाला व नागेशला वीजेचा जोरदार झटका बसला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मोठा भाऊ संदीपला सुद्धा विजेचा झटका बसला. दोघेही जमिनीवर पडले. उपस्थित इतर ग्रामस्थांनी आरडाओरडा केली व त्यांना तात्काळ खासगी वाहनाने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यावेळी नागेश यांचे जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत गुरव यांनी घोषित केले. व दुसरा भाऊ संदीप गवस हा गंभीर जखमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले. दुर्घटनेची वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयातच ठिय्या मांडला. जोपर्यंत महावितरणचे अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.

दुर्घटना घडल्याच्या तब्बल चार तासानंतर महावितरणचे अधिकारी पराग शिरधोणकर रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांना संतप्त ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले.  मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच जखमी युवकाच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि मयताच्या एका वारसास शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी लावून धरली. अखेर या मागण्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले.

एकाचा जागीच मृत्यू

       वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत गुरव यांनी जखमी बंधूंना तपासले असता नागेश गवस याचा जागीच मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. तसेच संदीप गवस यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले. दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली आणि रुग्णालयात एकच गर्दी उसळली. यावेळी उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी शवविच्छेदन करण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना मज्जाव केला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रथमत: येथे बोलवा अशी मागणी करत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, ठाकरे शिवसेना सोशल मीडिया संपर्कप्रमुख संदेश राणे यांसह सज्जन धाऊसकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तब्बल चार तासांनंतर महावितरणचे अधिकारी दाखल 

       संतप्त ग्रामस्थांच्या मागणीनुसार महावितरणचे अधिकारी पराग शिरधोणकर रुग्णालयात आले. यावेळी त्यांना संतप्त ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घटना घडली आणि या घटनेची माहिती तुम्हाला देऊन सुद्धा तुम्ही चार तासांनंतर दाखल होतात असा संतप्त सवाल उपस्थित करत सर्वसामान्य मेल्याचे तुम्हाला मेल्याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला. त्यानंतर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत महावितरणच्या हलगर्जीपणाचा पाढाच वाचला.


महावितरणवर गुन्हा दाखल करा !

महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास आले असता त्यांनी मुख्य वीज प्रवाह बंद करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आमच्या दोन ग्रामस्थांचा त्यांनी नाहक बळी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासह महावितरण वर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. तसेच घटनेच्या ठिकाणी ११ केव्हीची लाईन मागील तीन महिन्यांपासून खाली लोंबकळत असल्याचे महावितरणच्या साटेली भेडशी येथील शाखा अभियंता  चव्हाण यांना सांगितले होते. त्यांनी ती दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांचे प्रथम निलंबन करा अशी मागणी उपस्थित सज्जन धाऊसकर यांनी केली. आम्ही महावितरण ला कायम मदत करायला तयार असतो पण तुम्ही असे आमच्या निष्पाप लोकांचे जीव घेऊ नका अशी विनंती यावेळी सज्जन हाऊसकर यांनी पराग शिरधोणकर यांच्याकडे केली.

वरिष्ठांना या ठिकाणी बोलवा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतल्याने  शिरधोणकर यांनी उपकार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी यांना बोलावून घेतले. हत्तरगी हे सुट्टी निमित्त सांगली येथे आपल्या घरी जात असताना माघारी परतले. त्यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच शासनाकडून मृताच्या नातेवाईकांना मिळणारी मदत तात्काळ द्यावी, जखमीवर खर्चासाठी आर्थिक मदत करावी व मृताच्या एका नातेवाईकास शासकीय नोकरीची आम्ही द्यावी अशा तीन मागण्या लावून धरल्या. यावेळी श्री. हत्तरगी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

स्थानिक आमदारांवर ग्रामस्थांचा रोष!

यावेळी उपस्थितांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावरही रोष व्यक्त करण्यात आला. तालुक्याला अनेक समस्यांनी वेढले असतात आमदारांचे लक्ष नसल्याचे संतप्त ग्रामस्थांनी बोलून दाखवले.

मयत नागेश गवस हा दोन वर्षांपासून परदेशात खासगी नोकरीला होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो मांगेली येथे आपल्या घरी आला होता. काही दिवसांतच तो पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार होता. मात्र तत्पूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, भावजय व पुतण्या असा परिवार आहे.