देवगड : महाराष्ट्र राज्यात लाखो बेकार पदवीधर असून पदवी प्राप्त करून २५ वर्षे झालेल्या व वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व बेकार पदवीधरांना मासिक भत्ता रु पाच हजार व प्रवास भाडे सवलत देण्यात यावी अशी मागणी देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली. नागपूर येथील अधिवेशनात कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मागणी केली आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अनेक पदवीधारक युवक-युवती मोठ्या प्रमाणात बेकार असून कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा शासकीय-निमशासकीय नोकरी देखील त्यांना आजतागायत मिळालेली नाही. पदवी प्राप्त गेल्यानंतर सुमारे २५ वर्षे कालावधी उलटूनही आजही हजारो पदवीधर युवा युवती बेकार असून छोटे-मोठे मोल मजुरीचे काम अथवा तुटपुंज्या आर्थिक मदतीवर छोटे व्यवसाय करीत आहेत असे निदर्शनास आले आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर सुमारे २५ वर्षाचा कालावधी उलटलेल्या तसेच वयाची किमान ४५ वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना सद्यस्थितीत वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक उत्पन्नाचे साधन अत्यंत अल्प स्वरूपाचे असल्याने वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेले व पदवी प्राप्त करून किमान २५ वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींना किमान प्रति महिना रुपये पाच हजार व राज्य परिवहन महामंडळ प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत आवश्यक ते सर्वेक्षण करण्यात येऊन या मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व बेकार युवक-युवतींना योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी ही श्री. मांगले यांनी केली आहे. यावेळी देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्या प्रसाद गावकर, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण रानडे, सदस्य संतोष कुळकर्णी, गणेश आचरेकर, हेमंत कुळकर्णी ,स्वप्निल लोके ,नागेश दुखंडे, विष्णू धावडे, कणकवली पत्रकार संघाचे सदस्य संतोष राऊळ, संतोष पाताडे, उपस्थित होते.