
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपला जावा यासाठी आपण पुढील पाच वर्षांत पुढाकार घेणार आहोत. कणकवली आणि देवगड येथे मोठे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर देवगड आपल्याला पर्यटन हब बनवायचा आहे. दोन रात्री तीन दिवस जिल्ह्यात येणारे पर्यटक देवगड मध्ये एक रात्र राहतात. ते तीन दिवस दोन रात्र देवगड मध्ये थांबावेत, असा माझा प्रयत्न आहे. पडेल सरपंच यांनी वॉटर पार्क उभारण्यासाठी जागा दिली आहे.
या ठिकाणी वॉटर पार्क उभारले जाणार आहे. तसेच विजयदुर्ग किल्ल्यावर आरमार म्युझियम उभारण्यासाठी सिंधू रत्न योजनेतून दीपक केसरकर व प्रमोद जठार यांनी निधी दिला आहे. ते लवकरच पूर्ण होईल. कुणकेश्वर मंदिर केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत घेण्यात आले आहे. या मंदिराचा काशी विश्वेश्वर प्रमाणे विकास होणार आहे. यामुळे येथील पर्यटन वाढण्यास अधिक संधी मिळणार आहे. खा राणे यांनी केंद्रीयमंत्री असताना यासाठी ७५ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच देवगड तालुक्यात जाणारे देवगड-निपाणी आणि कासार्डे-विजयदुर्ग रस्ते अद्यावत बनविले आहेत. तर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे आपल्याला एम आय डी सी उभारायची आहे. नाधवडे कोल्हापूर जिल्ह्याच्या लगत असल्याने एम आय डी सी येथे उद्योग येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी आ राणे यांनी व्यक्त केला आहे.