'ईडी' सरकार हुकूमशाही | जनता यांना योग्य उत्तर देणार : अतुल रावराणे

पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला शिवसैनिकांना घ्यायचा आहे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 15, 2023 19:41 PM
views 107  views

वैभववाडी: राज्यातील ईडी सरकार सर्वसामान्य शिवसैनिक यांना विनाकारण त्रास देत आहे. हे हुकूमशाही सरकार असून जनता यांना योग्य वेळी धडा शिकवणार आहे .शिवसैनिकांनी आता पेटून उठून आगामी येणाऱ्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवण्यासाठी कामाला लागा. पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला शिवसैनिकांना घ्यायचा आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करून संघटना वाढवा येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांनी केले.

 वैभवाडी येथील वृंदावन रिसॉर्ट येथे तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी बँक संचालक दिगंबर पाटील तालुकाप्रमुख मंगेश लोके आधी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रावराणे म्हणाले, आताच राज्यातील सरकार शिवसेना ठाकरे गटावरती अन्याय करीत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना त्रास देऊन आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सच्चा शिवसैनिक कधीच यांच्या प्रलोभन व लोभाला बळी पडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसैनिकांनी आता संघटीत होणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात आपली संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे व ठाकरे परिवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना जागा दाखवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिकांनी पेटून उठत विरोधकांना चारीमुंड्या चीत करावयाचे आहे. आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे अस आवाहन श्री.रावराणे यांनी आजच्या मेळाव्यात केले.