सावंतवाडी : भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोकणपट्टी खालसा केली. संपूर्ण कोकण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहणार. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी मूळ शिवसेनेचा विश्वासघात करत भाजपशी जवळीक साधून सत्ता मिळवली. पण, आता त्यांची ही महत्त्वाकांक्षा कोकणातून धनुष्यबाण गायब करणारी ठरत आहे असं विधान उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, हे महापाप शिंदेंच्या शिवसेनेने केले आहे. याचा आता येथील जागृत मतदार नक्कीच आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मताने जाब विचारतील असं मत त्यांनी व्यक्त केल. तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री हे सध्या ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री व विद्यमान लोकसभा उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करीत आहेत. ते बघता त्यांच्यासोबत असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांचे चेहरे मात्र बरेच काही सांगून जात आहेत. दीपक केसरकर यांनी 2009 पासून नारायण राणे यांच्यावर केलेला दहशतवादाचा आरोप आता नक्की संपलेला आहे का ? हे सुद्धा त्यांनी सांगाल. या मतदारसंघातील सुज्ञ मतदार सगळं काही जाणून आहेत. थोर संसदपटू स्व. बॅरिस्टर नाथ पै व प्रा. मधु दंडवते यांसारखे वैचारिक रत्न संसदेत पाठवणारा हा तळकोकणाचा मतदार संघ आहे. त्यामुळे येथील मतदारांना मंत्री केसरकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या बगलबच्चांनी उल्लू बनवू नये. अन्यथा येथील मतदार काय करू शकतो ? हे अवघ्या भारताने अनुभवले आहे असे सांगत उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. परुळेकर यांनी राणे यांनी आपल्या प्रचारादरम्यान केलेल्या विविध वक्तव्यांचा समाचारही घेतला.
यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेवर कडाडून टीका केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना सजग राहण्याचे आवाहन करत आपल्या भावनांशी खेळ करणाऱ्या लोकांना आगामी काळात त्यांची योग्य जागा दाखवून द्यावी असे आवाहन देखील केले.