
दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अति पर्जन्य रुष्टी होत असल्याने तिलारी धरणाच्या जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या ७० टक्के क्षमतेने पाणी धरणात भरलेले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात बुधवारी तिलारी नदीत अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगून कोणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दि. २५ जूनपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जकाशयाच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. ७० टक्के क्षमतेने धरण भरलेले आहे. दिवसाला 3 टक्के पाणी धरणाच्या जलाशयात भरत आहे. 78 टक्के पाणी धरणात भरल्यावर हे पाणी नियंत्रीत करण्यासाठी पुच्छ कलव्या द्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तरी तिलारी नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी व शेतीची कामे करताना पाण्यात कोणीही उतरू नये. कपडे धुणाऱ्या महिलांनी नदीत कपडे धुण्यासाठी जाऊ नये सर्वांनी सतर्कता बाळगावी असे सांगण्यात आले आहे.