
दोडामार्ग : कोनाळ पंचायत समिती मतदारसंघात साक्षी संदीप देसाई यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रस्थापिताना आव्हान दिल्या नंतर तेथील निवडणूक लक्षवेधी ठरली असून, संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षातून बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय स्थानिक राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे हेवाळे गावातून प्रथमच पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार म्हणून साक्षी देसाई ठरल्या असून यापूर्वी त्यांनी हेवाळे गावच्या सरपंचपदाची जबाबदारी पाच वर्षे सांभाळली आहे. मुळातच घरात राजकीय बाळकडू घेतलेल्या सौ. देसाई यांनी सरपंच पदाच्या काळातील प्रशासकीय अनुभव, विकासकामे आणि निर्णयक्षम नेतृत्व याचा उल्लेख त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांचे समर्थक ठामपणे मतदार यांचेसमोर मांडत आहेत.
अपक्ष उमेदवारीनंतर साक्षी देसाई यांनी मतदारसंघातील विविध गावांत भेटीगाठी व संवादाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून अंतिम टप्प्यात आलेल्या प्रचारात सुद्धा त्या आघाडीवर आहेत. प्रचारात सातत्य राखल्याने समोरील विरोध, दबाव किंवा टीकेला न डगमगता मतदारांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार यांचे समोर आवाहन उभे केलंय. शिवाय या मतदार संघात स्थानिक त्यांच्या अभ्यासू, संयमी स्वभाव, शांत भूमिका आणि प्रशासकीय अनुभवाबाबत चर्चा होत असून, विशेषतः महिलां वर्गातून त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. गावाच्या स्वाभिमानाचा मुद्दा, स्थानिक विकास आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न यामुळे ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरत आहे.
दरम्यान प्रतिक्रिया देताना साक्षी देसाई यांनी सांगितले की, आपण जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून, मतदारांशी थेट संवाद आणि प्रामाणिक भूमिका हीच आपली ताकद आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून त्या मतदारसंघात कितपत प्रभाव पाडतात, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.










