केसरकरांच्या घोषणांवर आता विश्वास नाही

भाजपच्या एकनाथ नाडकर्णी यांची टीका
Edited by: लवू परब
Published on: September 23, 2025 16:46 PM
views 153  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सर्व हत्ती वनतारा मध्ये पाठविणारा अशी वल्गना करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्यावर आता येथील जनतेचा विश्वास उरलेला नाही अशी टीका एकनाथ नाडकर्णी यांनी केलीय. हत्ती पकड मोहीम राबविणार, हत्तीपासून शेतकऱ्यांना दिलास दिला जाणार अशी अनेक आश्वासने दीपक केसरकर यांनी यापूर्वी दिली आहेत. त्याशिवाय या आश्वासना व्यतिरिक्तही अनेक कोटींची उड्डाणे केसरकर यांनी केली आहेत. मात्र, आतापर्यंत किती पूर्ण झालीत हे सर्व जनतेला माहितीच आहे. त्यामुळे केसरकर यांच्या घोषणांवर आता विश्वास राहिलेला नाही अशी खरमरीत टीका भाजपचे पदाधिकारी एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे.

नाडकर्णी पुढे म्हणाले की, दीपक केसरकर यांना आतापर्यंत तीन वेळा तालुक्यातील जनतेने भरघोस मते घातली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केसरकर यांनी हत्ती प्रश्न निकाली काढून शेतकऱ्यांना सुखी केले जाईल असे सांगितले होते. मात्र, केसरकर यांच्याकडून एकदाही आश्वासनांची पूर्तता झालेली दिसली नाही आहे. शिवाय केसरकर यांनी यापूर्वीही अनेक विकास कामांची आश्वासने दिली आहेत. तिलारी धरण परिसराचा विकास होणार त्याठिकाणी अमयुझमेंट पार्क उभारले जाईल. चष्म्याचा कारखाना आणला जाणार, आडाळी एमआयडीसी मध्ये अनेक उद्योग उभारले जातील अशी नानाप्रकारची आश्वासने केसरकर यांच्याकडून देण्यात आली आहेत. आणि ती सर्व आश्वासने आतापर्यंत तरी फोल ठरली आहेत. त्यामुळे त्यांनी हत्ती पकड मोहीम राबविली जाईल असे सांगून आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करू नये असेही नाडकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. 

पालकमंत्री नितेश राणे शब्द पूर्ण करणार...

येणाऱ्या काळात हत्ती पकड मोहीम राबविली असा शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरत हत्ती पकड मोहीम राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण केली जाणार आहे. आणि जनतेचाही पूर्ण विश्वास पालकमंत्र्यांवर आहे असेही नाडकर्णी यांनी सांगितले. 

बाबुराव धुरी हे नावाचेच शेतकरी....

उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी हे आपण शेतकरी आहे अशी वल्गना नेहमी करत असतात. पण त्यांना शेतकऱ्यांचे काहीही सोयर सुतक नाही आहे. तेही याआधी खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांच्यासोबतच तालुक्यात काम करत होते. त्यावेळीही अशाच प्रकारे हत्ती प्रश्न गंभीर होता. त्यावेळी त्यांना कधी हा हत्ती प्रश्नांवर बोलावे काहीतरी करावे असे वाटले नाही. फक्त पक्षाकडून कार्यक्रम आला आहे म्हणून बेताल वक्तवे करत फिरत असतात. एकतर त्यांच्यासोबत आता कार्यकर्ते ही दिसत नाहीत आणि स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून वाट्टेल ते बोलत फिरत असतात. त्यामुळे त्यांनीही यापुढे पालकमनंत्री राणे यांचे काम पहावे आणि नंतरच बोलावे असेही नाडकर्णी यांनी बाबुराव धुरी यांच्यावर बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच बाबुराव धुरी यांनी आपल्या भिकेकोनाळ या गावी गायी पाळल्या आहेत हे अतिशय उत्कृष्ट काम केले आहे पण त्यांना चरण्यासाठी आसपासच्या गावांमध्ये सोडून घालत असल्यामुळे काहींचे नुकसान होत आहे त्यामुळे बाबुराव धुरी यांनी हत्तींवर लक्ष न देता आपल्या गायींवर लक्ष द्यावे अशीही टीका नाडकर्णी यांनी केली आहे.