
सिंधुदुर्गनगरी : “हरवले आभाळ ज्यांचे हो, तयांची सावली
सापडेना वाट ज्यांना हो, तयांचा सारथी…”
आणि
“जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,
निराधार आभाळाचा तोच भार साहे…”
या अर्थगर्भ ओळी जणू प्रत्यक्षात उतरल्या, जेव्हा सावंतवाडी येथील शासकीय अंकुर महिला वसतिगृहात एका निराधार नवजात बालिकेला मायेची सावली, नावाची ओळख आणि उज्ज्वल भविष्याचा आशेचा दीप मिळाला. दिनांक १४ जानेवारी २०२६, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी येथे संस्थेतील दाखल प्रवेशितेच्या नूतन बालिकेचा नामकरण सोहळा पार पडला.हा सोहळा जिल्हाधिकारी महोदया श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साकार झाला.विशेष बाब म्हणजे, संस्थेच्या तब्बल ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा नामकरण सोहळा पार पडला. स्वतः जिल्हाधिकारी महोदया यांनी त्या चिमुकल्या जीवाला ‘ऊर्जा’ हे नाव दिले. हे नाव केवळ संबोधन नव्हते, तर संघर्षावर मात करणाऱ्या जीवनशक्तीचे, प्रकाशाकडे नेणाऱ्या आशेचे प्रतीक होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे भावूक झाल्याचे दिसून आल्या. त्या म्हणाल्या, “समाजातील रंजले–गांजले, पीडित घटक यांच्या चेहऱ्यावर आपण जर हसू फुलवू शकलो, तर तेच खऱ्या अर्थाने आपल्या कामाचे समाधान असते. अशा क्षणांतूनच पुढील कामासाठी नवी ऊर्जा मिळते.”
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व अधिनस्त यंत्रणांकडून पीडित, गरजू महिला व बालकांसाठी केले जाणारे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. तसेच बालिकेचे आयुष्य नावाप्रमाणेच ऊर्जामय व प्रकाशमय व्हावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण प्रवासामागे करुणेची आणि आधाराची एक हृदयद्रावक कथा दडलेली आहे. गर्भावस्थेदरम्यान पतीने वाऱ्यावर सोडलेल्या पीडित महिलेस जिल्हा रुग्णालयातून ‘सखी वन स्टॉप सेंटर’, सिंधुदुर्ग यांचा पत्ता मिळाला. पतीचा आधार नाही, राहायला घर नाही, अशा अवस्थेत पाच महिन्यांची गरोदर असलेली ही महिला OSC सिंधुदुर्ग येथे दाखल झाली. तिची व्यथा ऐकून घेत, दीर्घकालीन निवास, वैद्यकीय मदत आणि गर्भावस्थेतील काळजी आवश्यक असल्याने तिला दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी अंकुर महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले.
अंकुर महिला वसतिगृहाने या महिलेस केवळ निवासच नाही, तर माहेरपणाची ऊब दिली. गर्भावस्थेपासून प्रसूतीपर्यंत तिची काळजी घेतली गेली. दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी तिला प्रसूतीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिला कन्यारत्न प्राप्त झाले.
ही आनंदवार्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी जिल्हाधिकारी महोदया यांना कळवताच, त्यांनी ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ या उपक्रमांतर्गत बालिकेचा नामकरण सोहळा संस्थेतच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः नाव ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले.
नामकरण सोहळ्यावेळी बालिकेची माता देखील अत्यंत भावूक झाली. महिला व बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाने, आपुलकीने आणि स्वतः जिल्हाधिकारी महोदया यांनी आपल्या कन्येचे नामकरण केल्याने ती भारावून गेली. संस्थेतील अन्य प्रवेशित व बालिकांशीही जिल्हाधिकारी महोदया यांनी संवाद साधला, त्यांच्या विचारपुशीने आनंदाचे वातावरण द्विगुणित झाले. यावेळी प्रवेशित महिलांनी चिमुकल्या ‘ऊर्जा’साठी पाळणा गीत गायले आणि संपूर्ण परिसर मायेच्या सूरांनी भरून गेला.
या हृदयस्पर्शी सोहळ्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, श्रीम. पूजा इंगवले, अभियंता, सावंतवाडी बांधकाम विभाग, श्रीम. माधुरी मुळीक, पोलीस निरीक्षक, सावंतवाडी, श्री. भिकाजी काटकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी, श्रीम. लक्ष्मी जांभोरे, प्रभारी अधिक्षिका, श्रीम. श्रीनिधी देशपांडे, विधी सल्लागार, श्री. राजगोविंद मडावी, जिल्हा संरक्षण अधिकारी, श्री. पुरूषोत्तम पाटील, संरक्षण अधिकारी, श्रीम. माया रहाटे, सदस्या बाल कल्याण समिती, श्रीम. कृतिका कुबल, सदस्या बाल न्याय मंडळ, श्री. सिकंदर आढाव, कनिष्ठ लिपिक, श्रीम. ऐश्वर्या कल्याणी, अधिपरिचारिका, श्रीम. रूपाली प्रभु, केंद्र प्रशासक, OSC, श्रीम. मिनाश्री नाईक, केस वर्कर, श्रीम. अर्पिता वाटवे, महिला समुपदेशन केंद्र, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नूतन बालिकेस शुभाशीर्वाद दिले.
हा सोहळा केवळ एका बालिकेच्या नामकरणाचा नव्हता, तर माणुसकी, करुणा आणि प्रशासनातील संवेदनशीलतेचा उत्सव होता. ‘ऊर्जा’ नावाच्या त्या चिमुकल्या जीवासोबतच समाजातही आशा, विश्वास आणि मायेची नवी ऊर्जा निर्माण झाली…










