
सावंतवाडी : आंबोली, चौकुळ, सावंतवाडी व दोडामार्ग या भागात ऊस उत्पादन होण्यासाठी जे काही कार्यक्रम हाती घ्यावयाचे आहेत यासाठी जी काही मदत लागेल, आर्थिक पाठबळ लागेल ते सर्व प्रकारचे आर्थिक पाठबळ सिंधदुर्ग जिल्हा बँक निश्चित देणार आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.
अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., कोल्हापुर लिज्ड युनिट, दौलत शेतकरी सह.साखर कारखाना लि., हलकर्णी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद आंबोली ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युट, पुणे चे माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी ऊस शेती व ऊस शेती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अथर्व-दौलत साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संचालक विजय पाटील तसेच आंबोली, चौकुळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.