सावंतवाडी : माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्या गाडीला मडुरा येथे अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असताना तशा प्रकारचे कुठलेही बोर्ड तसेच त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी येथे नसल्याने हा अपघात झाल्याचे वारंग यांचे म्हणणे आहे. अपघातात गाडीसह मोबाईलचे मोठे नुकसान झाले असून वारंग यांच्या नुकसानीस जबाबदार कोण याची उत्तरे बांधकामचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी द्यावीत अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
तर यासंदर्भात उपअभियंता वैभव सगरे यांना जाब विचारण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालयीन वेळेत ते घरी असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. याबाबत सगरे यांना विचारणा केली असता कार्यालयाच्या डागडूजीचे काम सुरू असल्यामुळे आपण कार्यालयात नव्हतो. मात्र, झालेल्या प्रकाराची पण चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.