LIVE UPDATES

एसटी महिला कर्मचारी निबंध स्पर्धेत धुळ्याच्या आरती जोशी प्रथम

वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: May 21, 2026 19:59 PM
views 21  views

वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. कर्मचारी महिलांसाठीच्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. “एस.टी. म्हणजे ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी” या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला राज्यभरातील महिला एस.टी. कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा ही आजही लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानली जाते. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची आरोग्यसेवा, कामगारांचे रोजगार, शेतकऱ्यांची बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास या सर्वांमध्ये एस.टी.ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या सेवेत कार्यरत महिला कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही जबाबदारीने सेवा बजावत असतात. त्यांच्या अनुभवांना, भावविश्वाला आणि सामाजिक जाणिवांना अभिव्यक्ती देण्यासाठी ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, एस.टी. कर्मचारी महिलांसाठी अशा स्वरूपाची राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या अभिनव उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण २७ महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी आपल्या निबंधांतून ग्रामीण महाराष्ट्रातील एस.टी. सेवेचे महत्त्व, महिला कर्मचाऱ्यांचे योगदान, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी तसेच प्रवाशांशी जुळलेले भावनिक नाते अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले.

स्पर्धेमध्ये धुळे येथील आरती अजय जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या निबंधामध्ये ग्रामीण भागातील जनजीवन आणि एस.टी. सेवेचे नाते अत्यंत संवेदनशीलतेने मांडण्यात आले होते. द्वितीय क्रमांक श्रद्धा सखाराम रेडकर यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक आरती किरण केरकर यांनी प्राप्त केला. तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सेजल स्वप्नील रजपूत आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्रांजल प्रदीप जाधव यांनी मिळविला.*

      स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण डॉ. सचिन परुळकर यांनी केले. त्यांनी परीक्षणादरम्यान सहभागी स्पर्धकांनी विषयाचे गांभीर्य, ग्रामीण समाजाशी असलेले एस.टी.चे नाते, महिला कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता प्रभावीपणे मांडल्याचे नमूद केले. अनेक निबंधांमधून एस.टी. ही केवळ प्रवासाची सेवा नसून ग्रामीण जनतेसाठी आधारवड असल्याची भावना प्रकर्षाने व्यक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

        या स्पर्धेच्या माध्यमातून महिला एस.टी. कर्मचाऱ्यांमधील लेखनकौशल्याला प्रोत्साहन मिळाले असून त्यांच्या अनुभवांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या आयोजक संस्थांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्पर्धक, सहकारी, हितचिंतक आणि सहयोगी यांचे आभार मानले.सर्व स्पर्धकांचे  कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली, वेंगुर्ला चे क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.