गुजरात येथील मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 29, 2025 17:20 PM
views 125  views

देवगड : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार मासेमारी करिता नौकांनी खोल समुद्रात जाऊ नये असे आदेश असून कोकण किनारपट्टीवर 40 ते 50 प्रतितास वेगाने वादळी वारे वाहणार आहेत मुसळधार पाऊस सदृश परीस्थिती निर्माण झाली असल्याने गुजरात येथील ८२ मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.त्या नौकांवर ६५८ खलाशी कार्यरत आहेत.

देवगड बंदरात गुजरातमधील ८२ नौका दाखल झाल्या असून मच्छीमारांना यावेळी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असुन सिंधुदुर्ग येथे यापुढे  29,30,सप्टेंबर व 1 ऑक्टोबर पर्यंत यलो अलर्ट  हवामान खात्याकडून देण्यात आला आहे 

समुद्रात वादळसद़ृश वातावरण निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांबरोबरच इतर नौकाही सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतात.यावेळी वादळी वारे व पाऊस यामुळे समुद्रातील वातावरण मच्छीमारीसाठी प्रतिकूल झाले आहे. आश्रयासाठी देवगड बंदरात गुजरात राज्यातील तब्बल 82 नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. याशिवाय मुंबई मधील नौकांचा यामध्ये समावेश आहे. हवामान विभागाने  ते 29 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा तसेच समुद्रात ताशी 45 ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार असण्याचा अंदाज वर्तविला होता. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, असा संदेश आल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच मालवण तसेच मुंबई व गुजरातमधील नौकांचा समावेश आहे.

समुद्राला उधाण सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे समुद्रात मच्छीमारी करताना दक्षिण वार्‍यामुळे समुद्र खवळण्यास सुरुवात झाल्यानंतर मच्छीमारी करीत असलेल्या नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतात. दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर स्थानिक नौकांबरोबरच रत्नागिरी, मालवण, मुंबई येथील नौकांप्रमाणेच तामीळनाडू, गुजरात, कर्नाटक मलपी या परराज्यातील नौकाही आश्रयासाठी देवगड बंदरात यापूर्वी दाखल झाल्या होत्या. सद्यस्थितीतही वातावरण खराब असल्याने समुद्रातील मच्छीमारी ठप्प झाली आहे.देवगड बंदर नौकांनी गजबजले आहे. वातावरण निवळण्यानंतर या नौका मच्छीमारीस पुन्हा समुद्रात प्रयाण करणार आहेत. परराज्यातील नौकांचा वादळी वातावरणामुळे सुरक्षित असलेल्या देवगड बंदराकडे आश्रयास येण्याचा कल जास्त असून यामुळे देवगड बंदराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे त्यादृष्टीने हे बंदर लवकरात लवकर विकसित व्हावे, अशी अपेक्षा देवगडवासीयांमधून व्यक्त होत आहे.