बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत करण्याची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2024 11:59 AM
views 211  views

सावंतवाडी : बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत. पण, ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आता शिक्षक निवडणूक लागली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाली नाही. प्रशासनाने ग्राहक सेवा देण्यासाठी आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी. सध्या चाकरमानी लोक गावागावात आले आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सेवा मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना शहरात धाव घ्यावी लागते असे राऊळ यांनी म्हटले आहे.

बीएसएनएलचे मंजूर टाॅवर उभारण्यात यावे आणि बंद अवस्थेत असलेल्या टाॅवरची देखभाल दुरुस्ती करून ते सुरू केले पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांना मोबाईल सेवा सुरळीत मिळाली पाहिजे म्हणून जिल्हाधिकारी, दूरसंचार जिल्हा प्रबंधक यांनी आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत चालू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ग्राहकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन मोबाईल सेवा आहे. त्यामुळे सर्वांचीच मागणी सेवा सुरळीत मिळाली पाहिजे अशीच आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. बीएसएनएलने जलदगतीने याबाबत कारवाई करावी आणि ग्राहकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन मोबाईल सेवा असल्याने ती सुरळीत चालू करावी अशी मागणी रुपेश राऊळ यांनी केली आहे.