
सावंतवाडी : बांदा शहरातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत असलेली तफावत दूर करून सर्वांना समान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आज येथे केली.
बाजारपेठेतील पूरग्रस्तांची 2019 सालची नुकसान भरपाई कित्येक वर्ष महसूलच्या गलथान कारभारामुळे अडकून पडली होती असा आरोप करण्यात आला. नुकसानग्रस्तांनी वेळोवेळी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही ही रक्कम त्यांच्या खात्यात पडत नव्हती शासकीय कागदपत्रे नाचूनही नुकसानग्रस्त हैराण झाले असल्याचं नुकसानग्रस्त याचं म्हणन आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष परब व युवा मोर्चाचे सरचिटणीस खतीब यांनी यासंदर्भात खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर 210 जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली. ही रक्कम वर्ग करताना काही जणांच्या रकमेमध्ये तफावत दिसून आली आहे. तफावत दूर करून सर्वांना समान रक्कम द्या मागणीसाठी आज त्यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये धडक देऊन तहसीलदार श्रीधर पाटील यांना जाब विचारला. कित्येक वर्ष मागणी करून मिळालेली रक्कम परिपूर्ण द्या अर्धवट रक्कम देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळू नका अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.