
सावंतवाडी : घरोघरी लक्ष्मीची पावले जायला पाहिजेत, सर्व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजेत त्यामुळे यावेळी अपुरे प्रकल्प,कामे व विविधांगी योजना साकार करण्यासाठी आमदार म्हणून काम करणार आहे. या युगात नरकासुराला हरविण्यासाठी संविधानाने मतदारांना अधिकार दिला आहे. तो प्रत्येक मतदार वापरून मला चौथ्यांदा विजयी करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जनतेला शेती, कृषी, मच्छीमारी, पर्यटन, महिलांसाठी स्वयंरोजगार, आंबा बागायतदार, शेतकरी अशा प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न योजना,चांदा ते बांदा योजना आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले,आताच्या युगात नरकासुराचा हरवण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी थेट युद्ध करण्याची गरज नसून, संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा उपयोग करून सत्ता स्थान काबीज करू पाहणाऱ्या नरकासुराला हरवा अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांनी विरोधकांवर नाव न घेता केली आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काहीजण कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत असून, लाखो रुपये स्वतः कमवत आहेत. काहीजण बाऊन्सरचा उपयोग करून कंत्राट मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. हीच अपप्रवृत्ती आहे. आणि अपप्रवृत्ती म्हणजेच नरकासुर त्यांच्या विरोधात मतदान करून त्यांचा पराभव करा, असे आवाहन देखील यावेळी केसरकर यांनी जनतेला केले आहे. आगामी काळात आपण स्वतः येथील जनतेची सेवा करण्यासाठी काम करणार असल्याचे देखील आश्वासन दिले आहे.