कोकणात विकासाची गंगा अविरत राहण्यासाठी राणे केंद्रात मंत्री असणे आवश्यक : दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: March 26, 2024 08:20 AM
views 339  views

सावंतवाडी  : नारायण राणे ही केवळ व्यक्ती नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळात कोकणातील मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह कोकणात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. केंद्राचे अनेक प्रकल्प आज त्यांच्यामुळे सिंधुदुर्गात होत आहेत. कोकणातील विकासाची ही गंगा अविरत राहण्यासाठी ते केंद्रात मंत्री असणे आवश्यक आहे. त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता विकासाच्या मुद्द्यावर त्यांना नक्कीच पाठिंबा देईल असा विश्वास देखील मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.   सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रुपेश पावसकर आदी उपस्थित होते.

पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विनायक राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंडळींना एकत्र करून गोळा बेरीज करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सध्या शिमगोत्सव आहे. त्यामुळे आरोपांचा हा धुरळा केवळ काही दिवसांपुरता आहे. शिमगोत्सव आठ ते पंधरा दिवस चालतो. आज धुरळा खाली बसल्यावर विनायक राऊत खरे काय आहेत हे येथील जनतेला समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते असून त्यांची आज देशाला गरज आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा निर्णयामुळे तेथे लोकशाही प्रस्थापित झाली. तीन तलाख विरोधातील कायदा करून मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय त्यांनी दूर केला. आज देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वितरित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा होत आहे.  त्यांच्या अशा निर्णयांमुळेच पाकव्याप्त काश्मीर मधील लोक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. लोकशाही नेत्यावर जनतेचा विश्वास असावा लागतो. लोकांची मन जिंकता आली तरच तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे देशातील जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मतदान करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.राहुल गांधी आपल्या कोणत्याही भूमिकेवर कायम राहत नाहीत. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. इडीच्या कारवायांबाबत गळा काढणे चुकीचे आहे. इडीने केलेल्या एकूण कारवाईमध्ये केवळ तीन टक्के राजकीय लोकांवर इडीने कारवाई केली आहे.अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील तक्रार तर काँग्रेसनेच इडीकडे दिली होती. मात्र, आता त्यांच्या अटकेनंतर काँग्रेसकडून नौटंकी केली जात आहे. इंडिया अगेन्स करप्शन चे नेते असलेले केजरीवाल स्वतःच करप्शन मध्ये गेल्यानेच त्यांना अटक झाली. अण्णा हजारे देखील आज त्यांच्यावर टीका करीत आहेत. त्यामुळे दिल्लीत चालू असलेले राजकारण हे केवळ मोदींना बदनाम करण्यासाठी सुरू असून जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

भाजपसोबत युतीत असताना ठाकरेंना मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या होत्या. मात्र आज बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस सोबत गेल्यानेच त्यांच्यावर कमी जागा लढविण्याची वेळ आली आहे. त्यांच्या महाविकास आघाडीची धोरणं, पवारांची धोरण व उद्धव ठाकरे यांची धोरण काय आहेत याबाबत वरिष्ठांशी बोलून मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व उघड करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे. आम्हीही जागा शिवसेनेसाठी मिळावी यासाठी आग्रही आहोत. पडणाऱ्या पक्षाकडे एखादाच उमेदवारी इच्छुक असल्याने त्यांची उमेदवारी लगेच जाहीर होते. मात्र निवडून येणाऱ्या जागेसाठी अनेकजण इच्छुक असतात. आमच्याकडेही महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे.  मात्र, महायुती जो निर्णय घेईल त्या उमेदवाराचा गावागावात जाऊन मी प्रचार करणार आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार आहोत. आम्हाला कोणावर टीका करायची गरज नाही. या मतदारसंघात भाजप शिवसेना व मित्र पक्षांची मोठी ताकद असून माहितीचा उमेदवार सहज निवडून येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.