CRIME | आंबोली घाट मृत्यू प्रकरणात पाच संशयिताना 13 पर्यंत पोलिस कोठडी

निर्जन ठीकाणी पार्टीत मारहाण केली आणि त्यातच सुशांत खिल्लारेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 06, 2023 17:57 PM
views 656  views

सावंतवाडी : आर्थिक देवघेवीतून आंबोली घाटात घडलेल्या सुशांत खिल्लारे याच्या खून प्रकरणात कराड येथील आणखीन तिघांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी त्यांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी 5 संशयिताना 14 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पार्टीच्या वेळी आपल्याकडून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढील नाट्य रंगले, अशी कबूली त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र मृतदेह घाटात टाकताना ते तिघे नव्हते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


अभय पाटील (३५), प्रविण बळीराम (२५) व राहूल माने (२३), अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहीती सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी सोळंके यांनी दिली. तर या प्रकरणात आणखीनही काहीजण असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने तपास सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


याबाबत अधिक माहीती अशी की, आंबोली घाटात खून करण्यात आलेल्या खिल्लारे याच्या हत्या प्रकरणात आणखीन काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी तपासाची सूत्रे फिरवण्यास सुरवात केली होती. दरम्यान, त्यांनी दोन दिवस केलेल्या तपासात अटकेत असलेल्या तुषार पवार याच्याकडून हा सर्व प्रकार उघड झाला होता. त्याने दिलेल्या माहीतीनुसार आपण आर्थिक देवघेवीतून कामगार पुरवणारा मुकादम असलेल्या खिल्लारे याचे अपहरण केले. त्यानंतर कराड येथील एका निर्जन ठीकाणी आपण सर्व पार्टी करण्यासाठी बसलो. यावेळी त्याला सर्वानी मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी भाऊसो माने यांच्यासह आपण मिळून आणखी चौघे होतो, असे त्याने सांगितले.


दरम्यान त्याने दिलेल्या माहीतीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोळंके यांच्यासह त्याचे सहकारी पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील,काका करंगुटकर,सचिन कोयंडे,अमित राउळ,गजानन देसाई,अभिजीत कांबळे आदीचे पथक काल कराड येथे गेले आणि त्यांनी तिघांना ताब्यात घेतले.


याबाबत उपविभागीय अधिकारी सोळंके म्हणाल्या, या प्रकरणात आम्ही संशयित पवार याची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर काही गोपनिय व्यक्तीकडुन मिळालेल्या माहीतीनुसार पुढील चौकशी करण्यात आली. यात काही सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सर्व चौकशीत या प्रकरणात या तिघांचा थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. चौकशी दरम्यान त्यांनी आपण हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.