महावितरणच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा

स्मार्ट मीटर बसवण्यावर तात्पुरती स्थगिती ; अन्य मागण्यांवर विचाराची ग्वाही
Edited by: मनोज पवार
Published on: August 05, 2025 10:58 AM
views 153  views

चिपळूण : महावितरण चिपळूण विभागाच्या मनमानी, गलथान आणि जनविरोधी कारभाराविरोधात महाविकास आघाडीकडून आज तीव्र संताप व्यक्त करत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांना हे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माजी आमदार रमेशभाई कदम (नेते, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट), सोनलक्ष्मी घाग (जिल्हाध्यक्षा, भारतीय काँग्रेस), बाळा कदम (विधानसभा क्षेत्रप्रमुख, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), लियाकत शहा (तालुकाध्यक्ष, काँग्रेस), बळीराम गुजर (तालुकाप्रमुख, शिवसेना - उद्धव गट), रतन पवार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट) आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी होते.

महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना, अटी किंवा जनजागृती न करता घराघरांवर स्मार्ट मीटर बसवले जात असून यामुळे सामान्य जनतेत संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चिपळूण शहर व ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय सेवा आणि घरगुती कामावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. याशिवाय चिपळूण नगरपरिषदेचे येणे थकीत असल्याचे कारण देत महावितरणने ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा वीजपुरवठा अचानक बंद केल्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा आणि इतर सेवा ठप्प झाल्या होत्या, याचा विशेष उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

महावितरणकडून नागरिकांना वेळेवर वीजबिल न मिळणे, चुकीची बिलिंग, सेवा केंद्रातील विलंब, तांत्रिक बिघाड आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली अस्वस्थता यावरही शिष्टमंडळाने रोष व्यक्त केला. महाविकास आघाडीकडून महावितरणकडे मागणी करण्यात आली की, स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृती आणि नागरिकांची सहमती घेऊनच अंमलबजावणी करावी, नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा सुनिश्चित करावा, शासकीय संस्था व महावितरण यांच्यातील वादाचा त्रास सामान्य नागरिकांना होऊ नये, ग्राहक सेवा केंद्र कार्यक्षम व उत्तरदायी करावे आणि तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात.

या निवेदनावर महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी सर्व समस्या आणि मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित समस्यांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शिष्टमंडळाने स्पष्ट इशारा दिला की, महावितरणने जर लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या सहकार्याने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. या निवेदनाच्या वेळी पत्रकार सतीश शिंदे, इम्तियाज कडू, साजिद सरगुरोह यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यामध्ये सुधीरभाऊ शिंदे, दादा आखाडे, यशवंत फके, अन्वर जबले, शमून घारे, गुलजार कुरवले, अजित गुजर, सचिन शेटे, विजय शिर्के, जनार्दन पवार, बापू चिपळूणकर, विलास चिपळूणकर, प्रवीण रेडीज, संतोष सावंत देसाई, महेंद्र काणेकर, दत्ताराम यादव, सिकंदर पालोजी, राजेंद्र गायकवाड, वैभव खेडेकर, गंगाराम मुंढे, सुधाकर जाधव, गणेश खेतले, राकेश दाते, मोहन खापरे, समीर सावंत, संजय रेड्डीज, अश्रफ फेबल, नियाज संगे, रफिक मोडक, राजन खेडेकर, सचिन (भैया) कदम, मनोज शिंदे, पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळ्ये, अनंत खैर, सुभाष गुरव, आकाश कदम, तेजस घाणेकर, निलेश डिके, श्री नारकर, निर्मलाताई जाधव, वीणा जावकर, ऐश्वर्या घोसाळकर, वैशाली शिंदे, रुही खेडेकर, निशिगंधा बांदेकर, तेजस्वी किंजळकर, सायली कदम, सीमा चाळके, रहमान जबले, विभावरी जाधव, सफा गोटे, सावित्रीताई होमकळस, उज्वला जाधव, सुचित्रा खरे, माधुरीताई शिंदे, शालिनी तटकरे आदींचा समावेश होता.