कामथे हरेकरवाडी नदीत केमिकल मिश्रित पाणी

शिवसेना आक्रमक
Edited by: मनोज पवार
Published on: June 23, 2025 14:49 PM
views 40  views

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण कामथे धरणात मोठा प्रकार उघडकीस आला आहे. चार टँकरद्वारे मध्यरात्रीमध्ये नदीत केमिकल सोडले जात असल्याचे  निर्दशनात आले.   स्थानिक ग्रामस्थ  आक्रमक झाले.  या संदर्भातच सोमवार दिनांक २३ रोजी चिपळूण शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ चिपळूण येथील अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांना  निवेदन देत जाब विचारला . यावेळी  महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी कुलकर्णी यांनी तीन दिवसामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे गावात टँकरद्वारे नदीत केमिकल सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार रात्री शनिवारी नऊ वाजता उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांनी दोन टैंकर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी तीन टँकरमधून तब्बल ६० हजार लिटर केमिकलचे पाणी नदीत सोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कामथे गावातील नद्यांचे पाणी शिवनदी  मार्गे वाशिष्ठी नदीला मिळते. तसेच यां नद्यांच्या मार्गावर परिसरातील गावांच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे दूषित पाणी झाले आहे. नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

या दूषित पाण्यामुळे  चिपळूण शहरासह परिसरातील गावांच्या नळ पाणी योजनांचे पाणी दूषित होण्याचा धोका आहे. तसेच या परिसरातील पर्यावरण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथे एका धाब्याच्या समोरच मोठा नाला आहे. त्या ठिकाणी शनिवारी रात्री ९ वाजता पाच टैंकर एका लाईनने उभे करण्यात आले होते. टँकरचे चालक - वाहक धाब्यावर जेवणासाठी थांबले असतील असा येथील नागरिकांचा सुरुवातीला समज होता. मात्र गावातील काही तरुण खेकडे पकडण्यासाठी रात्री जेव्हा नदीत गेले तेव्हा त्यांना तीन इंचाच्या पाईपने केमिकलचे पाणी नदीत सोडत असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी टँकरला घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेथील तीन रिकामे टँकर पळाले. तसेच भरलेल्या टँकरवरील चालक आणि वाहक ही तेथून पसार झाले. श्री हरेकर यांनी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

याच घडलेल्या घटना संदर्भात चिपळूण शिवसेना युवासेनेचे  पदाधिकारी  आक्रमक झाले.  त्यांनी सोमवारी सकाळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ येथील कार्यालयावर धडक दिली. येथील अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांना जाब विचारला. खडपोली   एमआयडीसी मध्ये ज्या कंपन्या अतिशय बेफीकीरपणे  वागतात. याकडे लक्ष का दिले जात नाही. नागरिकांच्या जीवाशी का खेळता. असे प्रश्न विचारून त्यांना भांबावून सोडले.  

यावर अधिकारी यांनी सारवासारव करीत उत्तरे दिली. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले.  शेवटी तीन दिवसात संबंधित कंपनी वरती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी  त्यांना निवेदन देण्यात आले.  ज्या कंपनीचे पाणी सोडले गेले. अशा कंपनीवरती कारवाई करण्यात यावी सदर कंपनी सखोल चौकशी करावी. अन्यथा   शिवसेना आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील अशा इशारा शिवसेना युवासेना चिपळूण तालुका प्रमुख उमेश खताते यांनी दिला आहे.  यावेळी महाराष्ट्राचे प्रदूषण महामंडळ चिपळूण अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले की आम्ही त्या  टँकर मधील पाण्याचे सॅम्पल आणि  बाजूला असलेल्या  विहिरीतील पाण्याचे सॅम्पल तपासणी केल्यानंतर जो अहवाला येईल त्यानुसार तीन दिवसात कारवाई करू असे सांगितले.

हे निवेदन देताना युवा सेना तालुकाप्रमुख चिपळूणचे उमेश खताचे, शिवसेना विभाग प्रमुख राम डिके,  शिवसेना तालुका सचिव संभाजी खेडेकर,  शिवसेना उपशहर प्रमुख भैय्या कदम व शाखाप्रमुख संतोष रहाटे, संतोष जावळे आणि सर्व ग्रामस्थ आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.