वैभववाडी : सडुरे सोनधरणे येथे वणव्यात ६एकरमधील काजू व आंब्यांच्या बागा जळून बेचिराख झाल्या .हा प्रकार काल (ता२०) दुपारी घडला . यामध्ये काजू,आंब्यासह इतर झाडे जळून काळे कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या प्रकाराची माहिती मिळताच गटविकास अधिकारी आर. डी. जंगले यांनी सायंकाळी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
तालुक्यात सर्वत्र आगी लागण्याचे प्रकार सुरू आहेत.या आगीमध्ये आंबा,काजुच्या बागांचे मोठे नुकसान होत असल्याचे प्रकार घडत आहेत.दरम्यान काल दुपारी सडुरे सोनधरणे भागात अचानक वणवा लागला.दुपारच्या वेळेत लागलेल्या या आगीने काही वेळातच भडका घेतला.ही आग विजयसिंह विठ्ठलराव काळे,जनार्दन भैरू काळे,अजितसिंह विठ्ठलराव काळे,जयसिंह जनार्दन काळे यांच्या आंबा काजू बागेत गेली. येथील काजू५६५, हापूस ३७,बांबू बेटी ५०, सागवान १०,एक गवताची तनस ,१५०मीटर विद्यूत वाहीनी तसेच सार्वजनिक नळपाणी योजनेचे पाईप जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले. ही आग विझविण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केला. परंतु या आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात आली नाही. या घटनेची माहिती मिळताच, गटविकास अधिकारी आर जंगले , कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडूळकर यांनी घटनास्थळळी भेट दिली.यावेळी सरपंच दिपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे,तालुका कृषी अधिकारी, युवराज पाटील,कृषी सहाय्यक यू व्ही मंदावाडा ,मंडळ कृषी अधिकारी सी एम कदम ,कृषी सहाय्यक डी डी म्हासेकर,ग्रामसेवक प्रशांत जाधव, तलाठी अक्षय लोनकर,कोतवाल मोहन जंगम व बागायतदार उपस्थित होते.तसेच या घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी भ्रमणध्वनी वरून माहिती घेत नुकसनग्रस्तांना दिलासा दिला आहे.