
सिंधुदुर्गनगरी : 160 वर्षांपूर्वीचे ब्रिटिश कालीन कायदे आता काढलं बाह्य झाले असून,कायद्यात अमूलाग्र बदल झाले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करताना फिर्यादीला या कायद्यात विशेष महत्त्व आहे. या कायद्याखाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्या तक्रारीचे काय झाले याची माहिती देण्याचे बंधन या कायद्यात आहे. तक्रारीची स्थिती काय आहे, तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहिती पोलिसांनी देणे बंधनकारक आहे. व या नव्या बदललेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, व भारतीय साक्ष अधिनियम या तीनही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल अशी ग्वाही सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी यानिमित्त एका कार्यक्रमात बोलताना दिली.
सोमवारपासून लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यांची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी या नव्या कायद्यांची माहिती देणारी एक पुस्तिका मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित झाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, जिल्हा विशेष पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर अन्य अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी आदि या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आतापर्यंत भारतीय दंड संहिता या कायद्याची अंमलबजावणी सुरू होती. या कायद्याखाली पूर्वी तक्रार दाखल होत होत्या व त्यानुसार या कायद्यातील तरतुदीनुसार तपास काम व न्याय निवाडा होत असे. आता हा कायदा बदलला असून सोमवारपासून नवीन कायद्यानुसार व त्यातील कलमानुसार तक्रारी दाखल होणार आहेत. ऑनलाइन तक्रार दाखल झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत संबंधित फियादीला प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाऊन ती तक्रार दाखल करावी लागणार आहे. यात पोलीस चौकशी सुरू राहणार असून, चौकशीचा कालावधी त्यानंतर न्यायालयाकडे पाठवण्याचा कालावधी याबाबत पोलिसांना कालमर्यादा या नव्या कायद्यात घालण्यात आली आहे. तसेच फिर्यादीला किंवा तक्रारदाराला त्याच्या तक्रारीबाबतची त्या त्या टप्प्यावरील माहिती देण्याचे बंधन पोलिसांना आहे. ऑनलाइन वरील सीसीटीएस प्रणाली तसेच समान वॉरंट याबाबतची माहिती त्यासाठी व्हाट्सअप सोशल मीडियाचा वापर करता येणार आहे. या नव्या कायद्यानुसार कलमांमध्ये बदल झाले असून त्यामधील तरतुदी ही बदलल्या आहेत. एक समानता असणाऱ्या गुन्ह्यांचे एकत्रीकरण करून काही कलमे कमी केली आहेत. कायद्यातील या बदलांमध्ये प्रामुख्याने तक्रारदाराला सहकार्य मिळेल व फिर्यादीच्या तक्रारिला न्याय मिळेल असे बदल या कायद्यात करण्यात आले आहेत. अशी माहिती दिली व एका प्रेझेंटेशन द्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
पोलिसांना कळविण्या अगोदर कोणत्याही जखमीवर प्रथम उपचार केले पाहिजेत. नंतर पोलीस चौकशी होऊन पुढील कार्यवाही होईल. पोलीस तक्रार दाखल नाही किंवा पोलिसांना कळविले नाही म्हणून त्या रुग्णांवरील उपचार थांबविता येणार नाहीत. तो अपघात असो दुर्घटना असो किंवा कोणती व्यक्ती जखमी असो. त्यावर प्रथम उपचार झाले पाहिजेत असेही मार्गदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी केले. याच पार्श्वभूमीवर तसेंच नवीन कायद्याची अंमलबजावणी याबाबतची माहिती देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठीही एक मार्गदर्शन शिबिर सोमवारी झाले.