बाळ मानेंनी सांगितला विधानसभेसाठी भाजपचा विजयाचा फॉर्म्युला

Edited by: मनोज पवार
Published on: September 18, 2024 14:44 PM
views 156  views

रत्नागिरी : एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपला ७५ हजार मते, विरोधकांना ८५ हजार व अन्य उमेदवार व नोटाला काही मते मिळाली. विधानसभेची स्थिती पाहता भाजपची हमखास ६० हजारांहून अधिक मते आहेत. काही आपले मतदार येऊ शकले नव्हते अशी १० हजार मते, तळ्यात-मळ्यात असणारी अशी २० हजार मते आहेत. त्यामुळे भाजपची मते १ लाखापर्यंत नेणे शक्य आहे. दुसरा कोणताच पक्ष लाखाच्या घरात जाणार नाही, असा दावा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी करून भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला. युती, आघाडीतले ६ पक्ष आहेत व अन्य पक्ष आहेत. साधारण दोन लाख मतदान होईल. त्यातील लाखभर मते मिळवली की जय भाजपचाच आहे, असे त्यांनी विश्वासपूर्वक सांगितले.


स्वयंवर मंगल कार्यालयात हे संमेलन झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. रत्नागिरी विधानसभेवर भाजपने दावा केला आहे. दसऱ्यानंतर निवडणूक जाहीर होऊ शकते. आपल्या पंचवीस दिवस आहेत, त्याकरिता आजपासून कामाला लागा अशा सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या.


बाळ माने म्हणाले की, आपण घरात जसा लहान बाळाचा जसा पांगुळगाडा काढतो, तसा युतीचा पांगुळगाडा काढला पाहिजे तरच पक्ष वाढेल. बूथप्रमुख, पन्नाप्रमुख पूर्ण तयारी करूया. ३५० बूथमध्ये किमान ४० पदाधिकारी जोडूया. नकारात्मक विचार सोडून द्या. माने गरीब आहेत, मग कसे होणार असा विचार करू नका. आपल्याकडे एनटीआर बॅंक, आरसी बॅंक व कार्यकर्त्यांची मोठी बॅंक आहे. दोन वर्षे वनवास सहन करतोय, तेव्हा कोण येत नाही विचारायला. या सर्व प्रकारावर भाजपने प्रतिक्रिया दिली नाही, तर एखाद्या दुसऱ्या पक्षाला संधी मिळते. समर्थ व सक्षम पर्याय म्हणून जनतेने भाजपकडे पाहिले पाहिजे की आपण युतीत फरफटत जायचे, मांडलिक व्हायचे याबाबत ठरवले पाहिजे, भाजपच्या अस्तित्वाची व रत्नागिरीच्या भवितव्याची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याची हीच योग्य वेळ आहे. कार्यकर्त्यांनी भाजप हा सक्षम पर्याय असल्याचा प्रचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतेज नलावडे, अनंत मराठे, दादा दळी, राजन फाळके, अॅड. विलास पाटणे, सतीश शेवडे, अॅड. धनंजय भावे, ऐश्वर्या जठार, विनोद म्हस्के, प्रशांत डिंगणकर आदी उपस्थित होते.


देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि रत्नागिरीत सुरेंद्र

दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, गुहागरमध्ये भाजपचे आमदार असतानाही सेनेला उमेदवारी दिली. त्याप्रमाणेच रत्नागिरीमध्येही असे करता येईल. त्याकरिता ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोलले पाहिजे. हा प्रयोग रत्नागिरीत करायला काय अडचण आहे, असे विचारा. दुसऱ्या इच्छुकांना विधानपरिषद द्या, राज्य सभा द्या, आमचे काही म्हणणे नाही. भाजपला हक्काचा आमदार मिळाला पाहिजे, ही मागणी आहे. आमचे प्रश्न मांडायला आमचा माणूसच हवा.