माझ्यामुळे कुणाचा कंबरेचा तर कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला

CM एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका
Edited by: ब्युरो
Published on: July 10, 2023 19:22 PM
views 123  views

मुंबई : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडायचे नाही. कोरोना काळ असल्याने मातोश्रीतूनच त्यांचे कामकाज चालायचे. त्यानंतर त्यांना मानेचा त्रास उद्भवला. ते आजारी पडले. त्यांच्यावर सर्जरीही झाली. मानेच्या त्रासामुळे ते घराबाहेर पडत नव्हते. मानेला पट्टा लावून असायचे. उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास होत असल्याने नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत झालं. उद्धव ठाकरे यांच्या या आजारपणावरून विरोधकांनी त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. आता त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली आहे.

शिंदे गटाने काल मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अल्पसंख्याक समाज आला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. जे विषय सोडवायचे ते पटकन सोडवणार आहे. जे धोरणात्मक निर्णय आहेत. तेही अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवणार आहे. बघत आहे, करत आहे. पाहात आहे हे मी करत नाही. होणारं असेल तर करून टाकतो. आधीचं सरकारही तुम्ही पाहिले. सर्व घरात बसले होते. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना बाहेर काढलं आहे. सर्वजण फिरत आहेत. जागोजागी जात आहेत. कुणाचा कंबरेचा पट्टा निघाला, कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला. सर्व निघालं. चांगलंय. चांगलंय. सर्व चांगलं आहे, अशी टीकाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.