
दोडामार्ग : अतिशय अवघड घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारी घाटात अवजड वाहनांना अपघातांचे प्रमाण सातत्याने घडत असून गुरवारी सुद्धा तिलारी घाट उतरत असताना एका तेलवाहू टँकरला वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने टँकर संरक्षक कठड्याला आढळल्याने खोल दरीत कोसळ्याण्यापासून थोडक्यात वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सार्वजनिक बांधकाम खात्याने या घाटात रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण झाल्याशिवाय अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान अवघड वळणावर हा टँकर अडकून पडल्याने प्रवाशी एस टी बस वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. अपघात गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान झाला.
पेट्रोलने भरलेला एक टँकर गुरूवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास तिलारी घाट मार्गे गोव्याला जात होता. तो घाटातील जयकर पॉईंट येथील अवघड वळण काढुन पुढे आला असता तीव्र उताराच्या वळणाचा चालकास अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट संरक्षक कठड्याला आदळली. यात टँकर खोल दरीत कोसळण्यापासून सुदैवानं बचावला. मात्र या अपघाताने रस्ता अडवला गेल्याने वाहतूक खोळंबली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सायंकाळची वेळ असल्याने बेळगावहून पणजीला जाणारी वस्तीची एसटी बस आणि कोल्हापूरहून दोडामार्गला येणाऱ्या दोन एसटी घाट रस्त्यातच अडकून राहिल्या आहेत. शिवाय दोडामार्गहून बेळगावला जाणारी आणि पणजीहून कोल्हापूरला जाणारी एसटीसुद्दा मार्ग बंद झाल्याने अडकल्या. त्यामुळे प्रवाशी वर्गाचे हाल झाले आहेत. सातत्याने हे अपघात घडत असल्याने यावर बांधकाम खात्याने ठोस उपायोजना आखण्याची मागणी होत आहे.