असलदे सोसायटी 100 टक्के वसुलीमध्ये जिल्ह्यात अव्वल : भगवान लोके

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 26, 2023 19:49 PM
views 92  views

कणकवली : कणकवली तालुक्यात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेच्या  माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने शेती कर्ज , पिक कर्ज , गृह कर्ज , शैक्षणिक कर्ज , शेती अवजारे कर्ज योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांची संस्था असलेली असलदे सोसायटीची उलाढाल 50 लाखांवर गेली आहे. संस्थेच्या भागभांडवलात वाढ झाली असून ना - नफा , ना - तोटा तत्वावर चालणा-या संस्थेला 2 लाख 7 हजार 796 रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षभरात शेतक-यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करुन देखील ही संस्था कणकवली तालुक्यातील 38 संस्थांमध्ये संस्था पातळीवर 100 टक्के कर्ज वसुली पात्र संस्था ठरल्याचे  पत्र जिल्हा बॅंकेने पाठवत अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेकडून 30 जुलै रोजी संचालक मंडळाचा गौरव होणार आहे.कणकवली तालुक्यात संस्था पातळीवर 100 टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीला यश आल्याची माहिती चेअरमन भगवान लोके यांनी दिली.

श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या सोसायटीचे कामकाज नुतन संचालक मंडळाच्या अधिपत्याखाली सुरु झाल्यानंतर “चेअरमन आपल्या दारी ” हा नाविन्यपुर्ण उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हयात सर्व प्रथम असलदे गावात राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक वाडीवार बैठका घेत आपल्या गावची सोसायटी म्हणजे काय ? कोणकोणत्या कर्ज योजना राबवल्या जातात. सोसायटी सदस्य होण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ? संस्थेच्या हितासाठी जनजागृती करण्यात आली . त्यामुळेच 109 सभासद गेल्या वर्षभरात करण्यात आले. कर्जदारांची सभासद संख्या देखील 55 वरुन 96 पर्यंत वाढ झाल्याचे भगवान लोके यांनी म्हटले आहे.

असलदे सोसायटीच्या माध्यमातून आता 55 शेतकरी सभासदांना शेतीकर्ज 14 लाख 83 हजार 835 रुपये , 6 शेतक-यांना आंबा पिक कर्ज 4 लाख 76 हजार , 14 शेतक-यांना काजु पिक कर्ज 8 लाख 38 हजार 100 रुपये , 15 सभासदांना अल्पमुदत बिगरशेती 2 लाख 54 हजार, 2 सभासदांना मध्य मुदत बिगरशेती 70 हजार 208 रुपये , एका सभासदाला मध्य मुदत शैक्षणिक कर्ज 55 हजार , 2 सभासदांना मध्य मुदत शेती  अवजारे कर्ज 53 हजार 240 रुपये , एका सभासदाला दिर्घ मुदत गृहकर्ज 9 लाख 90 हजार , एकूण 96 कर्जदारांना 42 लाख 20 हजार 383 रुपयांचे जिल्हा बॅकेच्या सहयोगाने वाटप करण्यात आले आहे. या सर्व कर्जदारांकडून जुन 2023 अखेर 100 टक्के वसुली सोसायटी स्थरावर करुन घेण्यात आलेली आहे. यातील काही कर्जदारांकडे गेल्या 10 - 12 वर्षापूर्वी पासुनची संस्था पातळीवर थकबाकी होती. ती कर्ज वसुली देखील सभासदांच्या सहकार्यामुळे पुर्णपेड झाली आहे. हे कामकाज करताना नेहमी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे सहकार्य लाभल्याचे चेअरमन भगवान लोके यांनी म्हटले आहे.    

असलदे सोसायटीच्या गेल्या वर्षभराच्या कारभारात 14 लाखांची उलाढाल 50 लाख 71 हजार 355 रुपये झालेली आहे. संस्थेच भाग भांडवल 7 लाख 50 हजार 420 रुपये झाले आहे. जिल्हा बॅकेकडे 3 लाख 92 हजार रुपयांच्या शेअर्स ची गुंतवणूक केली. चालु आर्थिक वर्षात 2 लाख 7 हजार 796 रुपयांचा नफा झालेला आहे. या संस्थेचे कामकाम यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , संचालक शत्रुघ्न डामरे , परशुराम परब , उदय परब , शामु परब , विठ्ठल खरात , प्रकाश खरात , कांचन लोके , अनंत तांबे , संतोष परब , सुनिता नरे , सचिव अजय गोसावी आदींनी मेहनत घेतली आहे. आगामी काळात संस्थेची उलाढाल 1 कोटी पर्यंत नेण्याचा संकल्प नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आल्याचे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात चेअरमन भगवान लोके यांनी म्हटले आहे.