तब्बल १३३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा..!

उलट्या जुलाबांनी विद्यार्थी हैराण
Edited by: भरत केसरकर
Published on: March 08, 2024 10:50 AM
views 1368  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल १३३ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर यानंतर अधिक प्रकृती खालावल्याने १३ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर मुलांना हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच लवू भिंगारे यांनी धाव घेत या मुलांना भरती करायला सुरुवात केले. या घटनेची माहिती मिळताच पालकांसह विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नवोदय विद्यालयात तब्बल 438 विद्यार्थी हे शिकत आहे. काही विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे. रात्री नऊ वाजता हे विद्यार्थी जेवण करून झोपी गेले. मात्र, या जेवणातील भाजी खराब होती. ती खाल्ल्याने या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आणी पहाटे तीन-चार वाजल्यापासून उलट्या आणि जुलाब सुरू झाले. शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना सकाळी सांगली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळत असल्याने अखेर त्यांना सावंतवाडी येथील कुटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एवढी घटना घडूनही पालकांना कुठलीच सूचना शाळा प्रशासनाने दिली नाही.

त्यामुळे सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल होताच पालकाने तीव्र नाराजी व्यक्त केली.जेवणात वापरलेली भाजीतून  ही विषबाधा झाल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.सांगेलीतून तब्बल तेरा विद्यार्थ्यांना सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर ७० विद्यार्थी हे सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. याघटनेची माहिती मिळतात सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शिवसेना उबाठा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी जि प सदस्य मायकल डिसोजा,काॅगेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,राजू मसुरकर यासह पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.नवोदय प्रशासनाच्या कारभाराबाबत  नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रात्री विषबाधा होऊन आज दुपारपर्यंत कोणालाच याची कल्पना नसल्यामुळे या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उबाठा सेनेचे कार्यकर्ते व पालक सांगेली येथे रवाना झाले आहेत.अजूनही काही मुले सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे.तर काही मुले ओरोस येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.