रेल्वे टर्मिनस व 'वंदेभारत' ला सावंतवाडी थांबा मिळण्यासाठी खा.सुळेंकडे अर्चना घारेंची मागणी

रेल्वेमंत्र्यांच लक्ष वेधणार : खा. सुप्रिया सुळे
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2023 17:15 PM
views 156  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सावंतवाडी रेल्वे स्टेशन 'वंदेभारत' ला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसचा रखडलेल्या कामाबाबत रेल्वे मंत्र्यांच लक्ष वेधत सावंतवाडीतील नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी केली आहे. तर स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करत सावंतवाडीतील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी अर्चना घारेंना दिले.


सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई - गोवा 'वंदेभारत एक्सप्रेस'ला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे अर्चना घारेंनी केली. सी.एस.एम.टी ते मडगाव या मार्गावर नव्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ७ तासात पूर्ण करता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला ठाणे,चिपळूण ,रत्नागिरी व कुडाळ हेच थांबे देण्यात आले आहेत. मात्र सावंतवाडी सारख्या तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर मात्र या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी ही बाब रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत सावंतवाडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी घारेंनी केली आहे. 


तसेच सावंतवाडी हे या रेल्वे मार्गातील प्रमुख स्टेशन असून परिसरातील पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या ५-६ वर्षांपासून प्रलंबित आहे.तसेच टर्मिनस 2 चे विस्तारीकरणाचे काम देखील प्रलंबित आहे. परिणामी या मार्गावर धावणाऱ्या २५-३० रेल्वे गाड्यांपैकी अवघ्या ९-१० गाड्या सध्या येथे थांबत आहेत. यामुळे लांबच्या प्रवाशांची संख्या कमी होत असून स्थानकाचा दर्जा देखील कमी होण्याची भीती आहे. तरी संबंधित प्रश्नाबाबत रेल्वे मंत्र्यांना समवेत खा. सुप्रिया सुळे यांनी चर्चा केल्यास सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे काम पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकेल व सावंतवाडी परिसरातील नागरिकांची, पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होईल यासाठी ही मागणी केल्याचे अर्चना घारे-परब यांनी सांगितले.


दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस दुरुस्तीचे काम तसेच वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी हे दोन्ही अत्यंत आवश्यक व तातडीची कामे आहेत. याबाबत आपण स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच सावंतवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन अर्चना घारेंना दिले.