सिंधुदुर्ग : २६ जानेवारी १९९८ रोजी प्राध्यापक मधू दंडवते यांच्या अथक प्रयत्नाने भारतीय रेल्वेतील कोकण रेल्वे प्रकल्पात कोकण रेल्वे मार्ग मुंबई ते मेंगलोर अशी रेल्वे प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. त्यास कोकण रेल्वे प्रवासी, कोकण प्रवासी, कोकणवासीय यांचा भरघोस प्रचंड प्रमाणात लाभ घेत, ही सेवा सर्व प्रकारे भारतीय रेल्वेस तुफान फायदेशीर ठरत आहे. मुंबई छ.शिवाजी म. टर्मि., दादर, लो. टिळक टर्मि.,दिवा, पनवेल या स्थानकातून दैनंदिन कोकण रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे.
मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे स्थानक गणले जाते. त्यातच ठाणे येथील सर्वेसर्वा धर्मवीर आनंद दिघे हे ठाणे वासियांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि ठाणे स्थानकातून कोकण रेल्वे मार्गावर जाणारे-येणारे कोकणवासीयांचे प्रवासी स्थानक ही आहे. दैनंदिन कोकणवासीय, कोकण प्रवासी या स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात असली तरी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य ठाणे शहरास नवीन नाही. तर अशा थोर समाजसेवकास खरी आदरांजली देण्याकरिता कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव २०२३ (१९ सप्टेंबर २०२३) ठाणे स्थानकातून ठाणे ते थीवीम रात्रौ १२ ते १ या वेळे दरम्यान धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस (अनारक्षित) किमान ३ दिवस अगोदर शनिवार १६ सप्टेंबर २०२३ पासून (परतीच्या प्रवासासह गणपती विसर्जन नंतर किमान ३ दिवस) चालवली जावी. जेणेकरून ठाणे शहरातील तसेच लगतच्या स्थानका जवळील कोकण प्रवासी यांस मोठ्या संख्येने लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करता येईल आणि हीच खरी धर्मवीर आनंद दिघे यांस आदरांजली वाहिली जाईल अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.