
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकरी अतिरिक्त गुरांची विक्री करण्यासाठी वाहनातून गुरांची वाहतूक करत असतात हे अवैध आहे. त्यांना प्रशासना व्यतिरिक्त खाजगी दलालांची टोळी अटकाव करून खंडणी गोळा करण्यासाठीच वाहनातून गुरे वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास देते. वाहनातील जनावरे जबरदस्तीने ताब्यात घेऊन ते परस्पर अन्य ठिकाणी नेऊन त्या गुरांची विक्री करून हे दलालच मलिदा लाटतात. अशा प्रवृत्तींच्या दलालांचा प्रशासनाने शोध घेऊन बिमोड केला पाहिजे असं मत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट ) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, हे प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही यामुळेच अशा व्यक्ती कायदा हातात घेऊन गोरगरीब शेतकऱ्यांवर जबरदस्तीने खंडणी गोळा करण्यासारखे प्रकार करत आहेत. प्रशासन हे सर्व उघडपणे पहात आहे. ही कृती तात्काळ थांबवीण्यासाठी प्रशासनाने आपल्या स्तरावर कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अशा शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया विरूद्ध लढा देण्यासाठी बाधीत शेतकरी वर्गाला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. याचा विचार प्रशासनाने गांभीर्याने करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे अमित सामंत यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबत होणाऱ्या अन्यायाची कल्पना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची भेट घेऊन दिली. यावर अमित सामंत यांनी या शेतकऱ्यांना घेऊन तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकअग्रवाल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. स्थानिक शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच जे कोणी सहभागी स्थानिक खंडणीखोर असतील आणि ते आपल्या आर्थिक फायद्यासाठी गुरे वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा छळ करून खंडणी गोळा करण्यासारखे प्रकार करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. याबाबत प्रशासनाने त्वरित यांची दखल घेतली नाही तर संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रशासनाला दिला आहे.