
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या 'सुरंगी' या वृक्षाचे जतन करण्यासाठी आणि पुढील पिढीला त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने सात ठिकाणी 'सुरंगी वन' विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी आज निरवडे येथे आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. या उपक्रमांतर्गत २ हजार ६०० सुरंगीची झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यात ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयांचा सहभाग घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्हा दुर्मिळ प्राण्यांसाठी जसा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे येथे दुर्मिळ वनस्पतींचाही मोठा साठा आहे. या वनस्पतींचा अभ्यास आणि जतन करणे ही काळाची गरज असल्याचे रेड्डी यांनी अधोरेखित केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, सावंतवाडी वन विभाग व निरवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज निरवडे येथील वनविभागाच्या नर्सरी मध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरंगीचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरी, अतुल पाटील, वैशाली पवार, गोपाळ सावंत, चंद्रकांत पडते, रामदास जंगले, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, रुपेश हिराप, निखिल माळकर, नरेंद्र देशपांडे, ओम टेंबकर,भुवन नाईक, सुभाष परुळेकर, हरी वारंग, दादा गावडे, सुहास पाटील, बाळा सावंत, नागेश गावडे, यशवंत पांढरे, संजय तानावडे, सुधीर माळकर, रेश्मा पांढरे, साक्षी भाईडकर, सुभद्रा कुबल, सुनिता भाईडकर, सुजाता जाधव, पूर्वा बागकर आदी उपस्थित होते.
राज्य शासनाचा 'सुरंगी वन' विकास प्रकल्प
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात "सुरंगी वने" विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वनराज्यमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. दुर्मिळ होत चाललेली सुरंगी वाचवणे आणि तिच्याबद्दलचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात सुरंगी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या सात ठिकाणी लवकरच ही झाडे लावण्यास सुरुवात होईल. जास्तीत-जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी ग्रामपंचायतींची मदत घेतली जाणार आहे. रेड्डी यांनी सांगितले की, या उपक्रमाचा शुभारंभ आज सिंधुदुर्गातून सावंतवाडीत झाल्याचा त्यांना अभिमान आहे. आगामी १५ ते २० वर्षांत जिल्ह्यात जास्तीत-जास्त सुरंगीची झाडे असावीत, यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सुरंगी हा वृक्ष अनेकांना रोजगार देणारा आहे. त्याची फुले गजऱ्यांसाठी किंवा देवासाठी वापरली जातात आणि ती सुकल्यानंतर त्यापासून अत्तरही बनवता येते. त्यामुळे या फुलांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक स्त्रोत निर्माण होतो, तसेच निसर्ग संवर्धनही होते, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
वृक्ष लागवडीचे महत्त्व
निरवडेच्या सरपंच सौ. सुहानी गावडे यांनी यावेळी बोलताना, पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी वृक्ष लागवड होत असली तरी त्यानंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते, याबद्दल खंत व्यक्त केली. भूखंड विकून प्लॉटिंग करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांचा नाश होत आहे. ही परिस्थिती बदलणे काळाची गरज असून, अन्यथा पुढील पिढीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले. सर्वांनी वृक्ष लागवड करण्यासाठी आणि जास्तीत-जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र पवार यांनी केले, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी निरवडे गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.