सावंतवाडी : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकरच्या योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचाव्यात यादृष्टीने त्यांनी माणगाव व सावंतवाडी तालुक्यात निरवडे ग्रामपंचायत येथे मार्गदर्शन केलं. त्यानंतर सावंतवाडी येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या यात्रेचा उद्देश आणि इतर मुद्यांवर भाष्य केलं.
मोदी सरकारने आपल्या कार्यकालात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केलं आहे. ८० करोड लोकांना अन्न, उज्वला गॅस योजना, हायवे, एअरपोर्ट, रेल्वे यात मोठ्या सुधारणा करण्याच काम केल्याचे मिश्रा यांनी यावेळी सांगितलं. तर महागाई, खाजगीकरण, राहुल गांधींची सातत्याने मोदींवर होणारी टीका, अजित पवारांचं भाजपासोबत येणे यारून पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. काहींना उत्तर तर काही प्रश्नांना उत्तर देणे त्यांनी टाळलं. राहुल गांधींचा प्रश्न विचारला असता कौन राहुल गांधी ? म्हणत राहुल गांधींच्या टीकेला खोचक उत्तर दिले. यावेळी माजी आमदार राजन तेली तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.