कणकवली : कणकवली नगरपंचायतीचा कार्यकाल शुक्रवार ५ मे रोजी संपत आहे. त्यानंतर न. पं. वर प्रशासक नेमला जाणार आहे. प्रशासकाचा कार्यकाल साधारण चार ते पाच महिन्यांचा असेल, अशी माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतीची मावळती 'कार्यकारिणी' १२ एप्रिल २०१८ या दिवशी स्थानापन्न झाली. नगराध्यक्ष समीर नलावडे हे थेट मतदारांमधून नगराध्यक्षपदी विराजमान झाले. नलावडे यांच्यासोबत सुरुवातीला बाबू गायकवाड व त्यानंतर बंडू हर्णे यांनी उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. या काळात न. पं. ला तावडे, मनोज उकिर्डे, अतुल पिंपळे मुख्याधिकारी म्हणून लाभले. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडेही काही काळ मुख्याधिकारीपदाचा 'चार्ज' होता.